आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंसतोषाचा उद्रेक शमवायला शिवसेनेचे नेतृत्व कमी पडले. संघर्ष न करता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात व्यक्त केले आहे. 'लोक माझे सांगाती'तून पवारांनी उद्धव ठाकरे कुठे कमी पडले हे थेट सांगितले आहे.
राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे राजकीय आत्मचरित्र असलेल्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे मंगळवारी (दि.3) प्रकाशन झाले. सकाळी 11 वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात प्रकाशनाचा सोहळा पार पडला. लोक माझे सांगातीच्या दुसऱ्या आवृत्तीत 70 पानांची जोड आहे. या आवृत्तीत 2019 नंतर राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आले आहे. भाजप आणि शिवसेनेची युती कशी तुटली? आणि महाविकास आघाडीची निर्मिती कशी झाली?, यावर शरद पवारांनी सुधारित आवृत्तीत लिखान केले आहे.
पहाटेच्या शपथविधीवर भाष्य
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रथमच सविस्तर भाष्य केले आहे. 'लोक माझे सांगाती', या आपल्या राजकीय आत्मचरित्रात अजितनं उचललेले पाऊल अत्यंत गैर होते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच, माझ्या संमतीनंच हे घडत असल्याची समजूत अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना करून देण्यात आली होती, असेही शरद पवारांनी सांगितले आहे.
सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न
लोक माझे सांगातीमध्ये शरद पवार म्हणतात, महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात ठाकरे यांनी माघार घेतली. शारीरिक अस्वास्थ्य हे त्यामागचे कारण असावे. करोनाच्या काळात राष्ट्रवादीचे सारे मंत्री मैदानात सक्रिय होते. उद्धव ठाकरे हे प्रशासनाच्या संपर्कात होते, पण दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून. महाविकास आघाडीचे सरकार हे भाजपला देशभरात मिळालेले सर्वात मोठे आव्हान होते. हे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न होणार याची कल्पना होती.
शिवसेनेतच वादळ माजेल...
शरद पवार पुढे म्हणतात, आमच्या पातळीवर असे डावपेच हाताळायला भक्कम होतो. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेतच वादळ माजेल याचा अंदाज आला नव्हता. हा अंसतोषाचा उद्रेक शमवायला शिवसेनेचे नेतृत्व कमी पडले. संघर्ष न करता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला, असे पवार यांनी म्हटले आहे.
राजकीय चातुर्य आवश्यक
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबाबत शरद पवार यांनी आपल्या पुस्तकात थेट उल्लेख केला आहे. एका भागात शरद पवार म्हणतात, राज्याच्या प्रमुखाला राज्यातील घडामोडींची बित्तंबातमी आवश्यक असते. त्यावर बारीक लक्ष ठेवावे लागते. उद्या काय होऊ शकते याचा अंदाज घेण्याची क्षमता हवी. त्यानुसार आजच काय पावले उचलायला पाहिजेत याचे राजकीय चातुर्य आवश्यक असते. याबाबतीत आम्हाला सर्वानाच कमतरता जाणवत होती. उद्धव ठाकरे यांना अनुभव नसल्याने हे घडले असले तरी ते टाळता आले असते.
उद्धव यांचे आजारपण वाढले
शरद पवार एके ठिकाणी म्हणतात, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अनेकदा चर्चा झाली. त्या चर्चेत ज्या सहजपणा असायचा. पण, सहजपणाची उणीव उद्धव यांच्याशी बोलताना जाणवली. सरकार स्थापन झाल्यानंतर काही काळानंतर उद्धव यांचे आजारपण वाढले. त्यांच्या ( उद्धव ) प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना समस्यांना सामोरे जावे लागले. डॉक्टरांच्या वेळापत्रकानुसार त्यांना काम करावे लागत होते, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे.
संबंधित वृत्त
आऊट बट नॉटआऊट:पवारांची निवृत्ती; अजितदादांची ‘वज्रमूठ’, राजीनामासत्र सुरू होताच पवारांनी फेरविचारासाठी मागितले दोन दिवस
सुमारे ६३ वर्षे संसदीय राजकारणात ‘अजिंक्य’ राहिलेले ८३ वर्षीय माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मंगळवारी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. राष्ट्रवादीचे अध्यक्षपदही सोडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच नवा अध्यक्ष निवडीसाठी त्यांनी समितीही जाहीर केली. ‘लोक माझे सांगती’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात पवारांनी ही घोषणा करताच सर्वांना धक्काच बसला. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.