आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरे गटाचा घणाघाती हल्ला:अवकाळीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला, राज्य सरकार मात्र भांग ढोसून पडले

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवकाळीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. राज्य सरकार मात्र भांग ढोसून पडले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे.

ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, महाराष्ट्रात धुलीवंदन उत्साहाची भांग सत्ताधाऱ्यांना जरा अतीच चढली होती. भांग पिऊन नाचण्यासाठी खास दिल्लीहून निमंत्रित बोलावले होते. धुलीवंदनाचा जलसा जुहूच्या पंचतारांकित हॉटेलात सुरू होता. त्याच वेळी महाराष्ट्राचा शेतकरी अवकाळी आणि गारपिटीने उद्ध्वस्त होत होता. हे चित्र विदारक आहे.

महाराष्ट्रात राज्यकर्ते बेफाम

अग्रलेखात म्हटले आहे की, अवकाळीचे विदारक चित्र विरोधकांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर मांडले. त्यामुळे तरी धुळवडीच्या ‘गुंगीत’ असलेल्या सरकारने जागे व्हायला हवे. विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नी शुद्धीत आहे. सरकार मात्र भांग ढोसून पडले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सत्तेची भांग चढली की राज्यकर्ते असेच बेफाम वागतात. महाराष्ट्रात आज तेच चित्र आहे.

सरकार शुद्धीवर आहे काय?

अग्रलेखात म्हटले आहे की, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री धुळवडीत रंगून गेले असतानाच राज्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, पण सरकारला याची शुद्ध आहे काय? विधिमंडळ अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न कमी व राजकीय मुद्देच जास्त उचलले जात आहेत. बुधवारी सकाळी विरोधी पक्षनेत्यांनी अवकाळी नुकसानीचा मुद्दा विधानसभेत उचलून सरकारला धारेवर धरले, तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनाच बजावले. ‘राजकारण करू नका, तुम्ही राजकारण करणार असाल तर मग आम्हालाही करावे लागेल. मागच्या चक्रीवादळाच्या नुकसानीची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही,’ असा बाण फडणवीस यांनी सोडला. त्यांचे हे बोलणे म्हणजे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत गंभीर नसल्याचे उदाहरण आहे.

सरकार भ्रष्ट सत्ताकारणात मश्गुल

अग्रलेखात म्हटले आहे की, अवकाळीने महाराष्ट्राचा मोठा भाग झोडपून निघाला. ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, कोकणात आंब्याचा मोहोर नष्ट झाला. पुणे जिल्हय़ात गहू, हरभरा, मका, द्राक्ष यांना फटका बसला. नाशिकमध्ये कांदा, द्राक्षाची वाट लागली. मराठवाडया तील पिके साफ झोपली. धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर येथे पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या चुली विझल्या. महाराष्ट्रातले सरकार भ्रष्ट सत्ताकारणात मश्गुल असताना शेतकरी अशा पद्धतीने हवालदिल झाला आहे.

अवकाळीमुळे तांदूळ, गहू साफ भिजून गेला आहे. डाळिंब, केळी, पपई यांचे नुकसान झाले. फळबागा नष्ट झाल्या व सरकार जुहूच्या पंचतारांकित हॉटेलपासून ठाण्यापर्यंत ‘रंग बरसे’ होळी खेळत राहिले. आता म्हणे मुख्यमंत्र्यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. फुटीर आमदार – खासदारांना ‘खोके’ मिळतात, पण शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची मदत मिळेल काय? हा प्रश्नच आहे.

अब्दुल सत्तार करतात काय?

अग्रलेखात म्हटले आहे की, अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका उत्तर महाराष्ट्राला बसला. मात्र कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या खिजगणतीत तरी अवकाळी पावसाचे हे नुकसान आहे काय? सरकार अद्याप नुकसानीचा अंदाजच घेत बसले आहे. सरकार शेतकऱयांच्या पाठीशी आहे, असे मुख्यमंत्री म्हणतात. मात्र फक्त पाठीशी उभे राहून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे काय? महाराष्ट्राचा कृषी विभाग अशा वेळी नेमके करतो काय? महसूल खात्याची यंत्रणादेखील शेतकऱयांच्या बांधावर पोहोचते काय? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

मुख्यमंत्र्यांना 40 आमदारांचीच चिंता

महाराष्ट्राच्या डोक्यावर जसे अवकाळी सरकार आले, तसे अवकाळी पावसाचे संकट राज्यावर कोसळले आणि त्याने हजारो हेक्टर शेतीतील उभे पीक आडवे केले. हे नुकसान सरकार कसे आणि कधी भरून काढणार, हा बळीराजासमोरचा मोठा प्रश्न आहे. मात्र मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पाठीराख्या चाळीस आमदारांचीच चिंता आहे. बाकीची जनता त्यांना महत्त्वाची वाटत नाही.

हेही वाचा,

आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प:अर्थमंत्री फडणवीसांच्या पोतडीतून काय निघणार?, शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करण्याची शक्यता

सत्तांतरानंतर आज शिंदे-फडणवीस सरकार प्रथमच आपला अर्थसंकल्प सादर करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे अर्थविभागाचा कारभार आहे. त्यामुळे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...