आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई महापालिकेचे खरे मालक हे नगरसेवक आणि स्थायी समिती आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाचा अधिकारही त्यांच्याकडेच असताना पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडून पूर्ण अर्थसंकल्प मांडण्याचा घाट घातला जात आहे. त्यांनी तसे न करता हंगामी अर्थसंकल्प मांडावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, अनिल परब यांनी गुरूवारी (ता.२) केली. पूर्ण अर्थसंकल्प मांडला गेल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा अनिल परब यांनी दिला.मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ४ फेब्रुवारी रोजी मांडला जाणार आहे. या अर्थसंकल्पाला विरोध करण्यासंदर्भात अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाची भूमिका मांडली. परब म्हणाले, ओबीसींचे राजकीय आरक्षण, कोविड, पालिकेतील नगरसेवकांची संख्या आदी कारणांमुळे राज्यातील विविध पालिकांच्या निवडणुका अधांतरी आहेत. पालिकांवर प्रशासक आहेत. प्रशासक हे पालिका तिजोरीचे मालक नसून केवळ व्यवस्थापक असल्याचे ते म्हणाले.
३५ हजार कोटींचा अर्थसंकल्प
महापालिका आयुक्तांना अर्थसंकल्प मांडण्याचा अधिकार असला तरी हा गैरवापर ठरेल, असा दावा परब यांनी केला. शिवाय, चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवण्यासाठी नगरसेवकच नाहीत. त्यामुळे मनमानी कारभार थांबवत तीन-चार महिन्यांसाठी हंगामी अर्थसंकल्प मांडावा. पालिका निवडणुका झाल्यानंतर नव्या सत्ताधाऱ्यांनी पूर्ण अर्थसंकल्प मांडता येईल, असे अनिल परब म्हणाले. अनिल परब हे मुंबई महापालिकेतील शिवसेनाचा कारभार पाहतात. यंदाचा महापालिकेचा अर्थसंकल्प साधारण ३५ हजार कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.