आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात मशिदींवरील भोंग्यांविरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांविरोधात पोलिस कारवाई सुरू आहे. या कारवाईविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली. ‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, सत्ता येत -जात असते, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही.. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही,’ असा इशारा त्यांनी दिला आहे. संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलिस असे काही शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैदराबाद संस्थानातले रझाकार आहेत, अशी टीका त्यांनी केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा आधार घेत राज्यातील मशिदींवरील भोंग्यांविरोधात आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाच्या अनुषंगाने मुंबईसह राज्यातील २८ हजार मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा देणे, तडीपार नोटीस बजावणे यासारख्या कारवाया करीत आहेत. या कारवाईविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुले पत्र लिहिले असून तीव्र नाराजी व्यक्त केली.
उत्तर भारतीयांची माफी मागितली तरच राज ठाकरेंना अयोध्येत प्रवेश
इकडे, राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा चांगलाच वादात सापडला आहे. उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरे यांना अयोध्येत प्रवेश दिला जाणार नाही, असा इशारा मंगळवारी भाजपचे खासदार ब्रिजभूषण िसंह यांनी अयोध्येतील धर्मसंसदेत दिला. या मागणीला धर्मसंसदेत उपस्थित साधू-संत,भाजप पदाधिकाऱ्यांनीही पाठिंबा दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.