आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
विधान परिषद निवडणुकीत भाजपचा किमान एक तरी उमेदवार विजयी झाला. पण मुख्यमंत्री असलेल्या शिवसेना पक्षाच्या हाती मात्र काहीही लागले नाही. सेनेचा एकही उमेदवार जिंकलेला नाही, असा टोला लगावत भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपला जुना मित्र शिवसेनेला आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला आहे.
शुक्रवारी विधान परिषदेच्या सर्व ६ जागांचे निकाल हाती आले. त्याचे विश्लेषण करताना फडणवीस म्हणाले, तीन पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांच्या शक्तीचा अंदाज आम्हाला आला नाही हे खरे. परंतु या तीन पक्षातील केवळ दोघांनाच या निवडणुकीचा फायदा झाला, एका पक्षाला मात्र एकही जागा मिळालेली नाही, ही गंभीर बाब आहे. भाजप नेत्या पकंजा मुंडे म्हणाल्या, आमची क्षमता १०० टक्के वापरण्याचा आम्ही विचार करू. आमच्या अपेक्षा चुकल्या. ते एकत्र लढले. जसे विजयाचे श्रेय घेतले जाते, तसा पराभव आम्ही स्वीकारला पाहिजे. भविष्यात शिवसेनेला आमची उणीव नक्की भासेल.
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली. “सध्या सुरुवात वाईट झाली आहे. पण या वाईट सुरुवातीचा शेवट हा नक्कीच चांगला आणि सकारात्मक होईल”, असे त्या समाज माध्यमांवर व्यक्त झाल्या. ‘जनतेने महाविकास आघाडीला स्वीकारले याऐवजी भाजप बेसावध राहिली, असे म्हणणे योग्य ठरेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ते म्हणाले, ही सार्वत्रिक निवडणूक नाही. नागपूर आणि पुणे या भाजपच्या हक्काच्या जागा होत्या, हे खरे आहे. त्या गमावणे हे राजकीय दृष्टीने चिंतनीय आहे. त्याचे चिंतन केले जाईल. पण भाजपची पिछेहाट अजिबात नाही, असा दावा मुनगंटीवार यांनी केला.
निलेश म्हणाले, तीन पक्ष एकटे लढले असते तर त्यांची काय अवस्था झाली असती हे वेगळे सांगायला नको, असे ते म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.