आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय प्रवेश समितीमार्फत सुरू असलेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेत शहरातील अनेक महाविद्यालयांना एकीकडे विद्यार्थीच मिळाले नसल्याची स्थिती असताना ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयांमध्ये मात्र, क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश करण्यात आले आहेत. हा शहरी भागातील शाळा, महाविद्यालयावर अन्याय असून क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश केलेल्या महाविद्यालयांची चौकशी त्वरेने करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाने केली आहे.
नागपूर जिल्ह्यात वर्ग अकरावीचे प्रवेश दोन स्तरावर होत आहेत. शहरातील शाळा व महाविद्यालयांमधील प्रवेश हे केंद्रीय प्रवेश समितीमार्फत होत असून नागपूर ग्रामीण व शहरालगतच्या शाळा व महाविद्यालयातील प्रवेश त्यांच्या स्तरावर केले जात आहेत. केंद्रीय प्रवेश समितीमार्फत करण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये जवळपास 41 हजाराची प्रवेश क्षमता असताना केवळ 27 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज केले आहेत. त्यामुळे जवळपास 14 हजार जागा रिक्त राहणार आहेत. याउलट ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश झालेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
पूर्ण प्रवेश होणार नाहीत अशा बहुतेक अनुदानीत शाळा, महाविद्यालयांचे वर्ग विनाअनुदानीत झाले असून त्यांच्याकडे अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. शहरी भागातील शाळा, महाविद्यालयांवर हा अन्याय असून या प्रकरणाची बाह्य एजन्सीमार्फत तपासणी करून सदर महाविद्यालयांमध्ये झालेले प्रवेश रद्द करण्यात यावे व संबंधित महाविद्यालयांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी पुण्याच्या शालेय शिक्षण विभाग आयुक्तांना केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.