आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Due To The Katangi Project, The Existence Of Pindkepar Village Is In Danger Collapse Of Houses Due To Wet Walls, Demand For Subsidy Amount

कटंगी प्रकल्पामुळे पिंडकेपार गावाचे अस्तित्व धोक्यात:घरांच्या भिंती ओल्या झाल्यामुळे घरांची पडझड, अनुदानाच्या रक्कमेची मागणी

नागपूर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाेंदीया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कटंगी मध्यम प्रकल्पाच्या जलाशयातील पाण्यामुळे पिंडकेपार गाव दलदलीत अडकले आहे. घरांच्या भिंती ओल्या पडल्याने घरांची पडझड होत आहे. त्याचबरोबर अनेक घरांच्या भिंतीना ओल आल्यामुळे घर कधीही जमीनदोस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जलाशयातील पाण्यामुळे भूजल पातळी वाढल्याने पिंडकेपार गावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

15 जानेवारी 1983 रोजी कटंगी मध्यम प्रकल्प जलाशयाच्या बांधकामासाठी मध्यम प्रकल्प विभाग, गोंदिया यांनी अधिसूचना जारी केली होती. 1990 मध्ये बांधकाम सुरू झाले. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी पिंडकेपार गावातील शेतकऱ्यांची 123.21 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. अशा प्रकारे पाथरी गावातील शेतकऱ्यांची 132.15 हेक्टर आणि कटंगी गावातील शेतकऱ्यांची 11.01 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. जलाशयाचे बांधकाम पूर्ण झाले असून, या जलाशयाच्या पाण्याने जिल्ह्यातील 2 हजार 453 हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होत आहे.

नोकऱ्यांअभावी प्रकल्पग्रस्त बेरोजगार

शेतकऱ्यांना कमी भावात मोबदला देऊन जमिनीचे संपादन केल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांकडून नेहमी केला जातो. आर्थिक स्थिती मजबूत असलेल्या शेतकऱ्यांनी इतर ठिकाणी शेती खरेदी केली. परंतु प्रकल्पग्रस्तांपैकी 90 टक्के शेतकऱ्यांनी जमीन खरेदी केली नाही, ते अजूनही भूमिहीन आहेत. नोकऱ्यांअभावी प्रकल्पग्रस्त बेरोजगार झाले आहेत.

भूजल पातळीत वाढ

मात्र, आता गेल्या तीन ते चार वर्षांपासून या जलाशयाच्या पाण्यापासून नवीन समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. या समस्येमुळे गावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कटंगी प्रकल्पातील पाण्यामुळे पिंडकेपार गावाच्या भूजल पातळीत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पिंडकेपार गावाला दलदलीचे स्वरूप आले आहे.

अनुदानाची मागणी

घरांच्या भिंतीना 3 ते 4 फुटांपर्यंत ओल आली आहे. त्यामुळे घरे सरळ खाली पडत आहेत. तर अनेक कोसळण्याच्या वाटेवर आहेत त्यामुळे, पीडितांनी त्या घरांमध्ये राहणे सोडले आहे. तर अनेक गावकरी दुसऱ्याच्या घरात राहत आहेत. एवढेच नव्हे तर अनेकांनी गाव पण सोडले आहे. गावातील निम्म्याहून अधिक घरे जीर्ण झाली आहेत. पुनर्वसन योजनेंतर्गत गावातच नवीन घरे बांधण्यासाठी अनुदानाची रक्कम द्यावी, जेणेकरून गावाचे अस्तित्व वाचून ग्रामस्थ या धोक्यातून मुक्त होतील, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

438 कुटुंबांचा जीव धोक्यात

पिंडकेपार गावाची लोकसंख्या अडीच हजारांहून अधिक असून तेथे 438 कुटुंबे असल्याचे सांगण्यात आले. 80 टक्के घरांच्या भिंती ओल्या असल्याने ही घरे कधीही कोसळू शकतात. त्यामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. दुसरे पर्याय नसल्यामुळे गावकऱ्यांना जीर्ण घरांमध्ये राहावे लागत आहे. या 438 कुटुंबांना गावातच पर्यायी जमीन देऊन पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी होत आहे.