आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड अंतर्गत येत असलेल्या कोठी येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार सोमवारी ५ डिसेंबर रोजी घडला. या आश्रम शाळेतील २२ विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून वैद्यकीय तपासणी नंतर मंगळवारी यातील १८ विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सोमवारी सकाळी इयत्ता सहावीच्या एका विद्यार्थिनीने आपल्या आत्याच्या घरून आंबाडीची भाजी आणली व ती भाजी आपल्या सहा-सात मैत्रिणींशी वाटून खाली. यानंतर शाळेत गेले असता अचानक काही मुलांना पोट दुखायला लागले आणि उलटीला सुरुवात झाली. शालेय प्रशासनाने याची माहिती वरिष्ठांना कळवली. माहिती मिळताच वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश तीरनकर यांनी आपल्या चमूसह आश्रम शाळा कोठी गाठले. या विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे हलवण्यात आले. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सातमवार यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून औषधोपचार सुरू केले असून त्यात सहा ते सात विद्यार्थ्यांना आंबाडीची भाजी खाल्ल्याने विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. तर उर्वरित सर्व विद्यार्थी घाबरून गेल्याने भीतीपोटी त्यांनाही असे जाणवायला लागले असावे असे त्यांचे म्हणणे आहे.
सर्व विद्यार्थी हे इयत्ता पाचवी ते दहावीचे आहेत. सर्व विद्यार्थी धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.