आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालामुळे राम मंदिर उभारणीचा मार्ग प्रशस्त झाल्यानंतर महाराष्ट्र व गोव्यात १ कोटी ४० लाख कुटुंबांशी संपर्क साधून निधी संकलन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये दोन हजार रुपये व त्यापुढील रकमेचे धनादेश श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या नावे जमा करण्यात येणार आहेत.यापूर्वी अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी संपूर्ण देशातून विटांचे संकलन करण्यात आले होते.
येत्या १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत ही निधी संकलन महामोहीम हाती घेण्यात येणार असून १५ डिसेंबरपर्यंत पत्रपरिषद घेऊन माहिती देण्यात येणार आहे, असे ट्रस्टच्या सूत्रांनी सांगितले. यापूर्वी स्वामी विवेकानंद स्मारक उभारणीसाठी एक रुपयाच्या कुपनाद्वारे निधी संकलन मोहीम हाती घेण्यात आली होती. तर १९८९ मध्ये श्रीराम शिलापूजनाच्या वेळी १.२५ रुपयाच्या कुपनद्वारे अडीच लाख गावांतून निधी संकलन करण्यात आले होते. त्याच धर्तीवर ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. आता संपूर्ण देशभरातील ४ लाख गावांमधील ११ कोटी कुटुंबांशी संपर्क साधून प्रतिव्यक्ती १० रुपये, प्रतिकुटुंब १०० रुपये संकलन करण्यात येणार आहे. २ हजार रुपयांपासून पुढील रकमेसाठी ट्रस्टच्या नावाची पावती देण्यात येईल. २ हजार रुपयांपासून पुढील रकमेसाठी धनादेश घेण्यात येईल.
निधी संकलनासाठी गटागटाने फिरा
निधी संकलनासाठी समूहाने वा गटाने फिरावे, निधी संकलनाचे आवाहन करणारे पत्रक हिंदी आणि इंग्रजीत पाठवण्यात येईल. आवश्यकतेनुसार ते मातृभाषेत भाषांतरित करून घ्या, अशा सूचना ट्रस्टने केल्या आहेत. निधी संकलनाची माहिती रोजच्या रोज अयोध्येला ट्रस्टकडे पाठवण्यासाठी एका साॅफ्टवेअरची निर्मिती करण्यात येणार असून ऑनलाइन पैसे भरता यावे म्हणून एक अॅप तयार करण्याचे विचाराधीन असल्याचे ट्रस्टने म्हटले आहे.
औरंगाबाद प्रांतात ३५ लाख घरांना भेटी
देवगिरी (औरंगाबाद) प्रांत ३५ लाख घरे, कोकण प्रांत ३० लाख, पश्चिम महाराष्ट्र प्रांतात सुमारे ३५ लाख कुटुंबे आणि विदर्भात ४० लाख कुटुंबांशी संपर्क साधून निधी संकलन करण्यात येणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.