आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्यमेव जयते फार्मर कप 2022 पुरस्कार वितरण सोहळा:नैसर्गिक, गटशेतीतून शेतकरी संपन्न होईल : फडणवीस

पुणे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेती लाभाची व्हावी यासाठी विषमुक्त नैसर्गिक शेती आणि गटशेतीशिवाय पर्याय नाही. गटशेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन यंत्र आणि नवे तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता निर्माण होत असल्यामुळे शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी गटशेतीला प्रोत्साहन देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली.

पाणी फाउंडेशनतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२२’ च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला पाणी फाउंडेशनचे संस्थापक चित्रपट अभिनेते आमीर खान आणि किरण राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘वातावरण बदलामुळे शेतीसमोर मोठी आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत अवर्षण, अतिवृष्टीच्या फेऱ्यातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी शाश्वत शेतीला पर्याय नाही आणि त्यासाठी विषमुक्त, नैसर्गिक शेतीकडे जावे लागेल. उत्पादन खर्च कमी करून जमिनीचा पोत सुधारावा लागेल. या सर्व गोष्टी आपण नैसर्गिक शेतीद्वारे करू शकतो. आमिर खान यांनी पाणी फाउंडेशनची कल्पना मांडून शेतीच्या क्षेत्रात क्रांती आणली. फाउंडेशनने जलसंधारण अणि शेतकऱ्यांना समर्थ करण्याच्या कार्यात सातत्य दाखवले आहे. त्यांनी वॉटर कपच्या माध्यमातून जलस्वयंपूर्ण गावे तयार करणे, विषमुक्त शेती आणि शेतकऱ्यांचे गट तयार करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक कशी करता येईल, याचे सुंदर मॉडेल तयार केले.

सोलार फीडरद्वारे शेतकऱ्यांना १२ तास वीज : दिवसा १२ तास वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी योग्य आहे. यासाठी ॲग्रीकल्चर फीडर सौरऊर्जेवर आणण्यात येतील. यावर्षी ३० टक्के फीडर सौरऊर्जेवर आणण्यात येतील. पुढील दोन वर्षांत उर्वरित फीडर सौरऊर्जेवर आणले जातील व शेतीसाठी दिवसा १२ तास वीज मिळू शकेल. यासाठी सरकारी पडीक जमिनीचा उपयोग करण्यात येईल. ज्यांच्या शेतात काही पिकत नसेल अशा शेतजमीन शेतकरी भाड्याने देवू शकतील.

संशोधकांच्या गोष्टी आत्मसात कराव्यात : आमिर खान
सरकारने सकारात्मक दृष्टिकोनातून दिलेल्या सहकार्यामुळे चांगले काम करता आले. शेतकऱ्यांनी वैज्ञानिक व संशोधकांनी सांगितलेल्या गोष्टी आत्मसात करून पुढे जावे. येत्या काळात महाराष्ट्रात कृषि उद्योजक तयार व्हावेत. शेतीला व्यवसायाच्या दृष्टीने पाहून नवतरुणांनी शेतीकडे वळावे, यातील समस्या दुर करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, असे आमिर खानने म्हटले

बातम्या आणखी आहेत...