आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई-नागपूरला जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर-शिर्डी असा प्रवास केला. यादरम्यान दोघांनीही स्वत: गाडी चालवली. त्यांनी जवळपास १५० किमीच्या वेगाने ५२० किलोमीटरचे अंतर अवघ्या ५ तासांमध्ये पार केले. ‘आम्ही खऱ्या अर्थाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गाने चालणारे असून रविवारीही त्यांच्याच मार्गाने प्रवास केला. राज्याचा या पुढील प्रवासही बाळासाहेबांनी दाखवलेल्या मार्गानेच होईल,’ अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या.
शिंदे म्हणाले की, ‘आम्ही ज्या वेगाने आमच्या गाड्या चालवणार आहोत त्याच वेगाने राज्याचा कारभारही हाकत आहोत. यापुढेही राज्याचा कारभार असाच सुसाट हाकू. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून समृद्धी महामार्ग साकारला. या महामार्गाच्या लोकार्पणाचा मला खुप आनंद होत आहे. कारण या मार्गाची मुहूर्तमेढ रोवली गेली तेव्हा या खात्याचा मी मंत्री होताे,’ असेही शिंदे म्हणाले.
एकाच गाडीतून केला प्रवास : मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी रेंज रोव्हर कारने समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा दौरा पूर्ण केला. महामार्गाचे झीरो माइल असलेल्या हिंगणा आऊटर रिंग रोडवरील शिवमडका गावापासून हा प्रवास सुरू झाला. या प्रवासादरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत राधेश्याम मोपलवार, अनिल गायकवाड हे एकाच कारमध्ये होते.
शिंदेंनी लाड यांचे वक्तव्य फेटाळले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला आहे, हा इतिहास सर्वांना माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, अशा शब्दांत प्रसाद लाड यांच्या वक्तव्याला फेटाळले. भाजप नेते प्रसाद लाड यांनी शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.
वाहनाचा वेग १५० किमी प्रतितास या महामार्गावर १५० किमी प्रति तास वेगाने वाहन चालवावे लागते. डोंगराळ भागात १२० किती वेग निश्चित केला आहे. त्याचबरोबर बुलडाणा जिल्ह्यातून ८९ किमीचा महामार्ग मेहकर, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या तीन तालुक्यातून जात आहे. जालना जिल्ह्यातील जालना व बदनापूर तालुक्यातील २५ गावांतून ४२ किलोमीटरचा महामार्ग जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून ५४ किलोमीटरचा महामार्ग जातो. या दोन्ही उभय नेत्यांनी दौऱ्यास सुरुवात केल्यानंतर या महामार्गाच्या कार्यकक्षेतील जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यांचे लोकप्रतिनिधी, नागरिक आणि अधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.