आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचंद्रपूर जिल्ह्यात वाघ आणि मानव संघर्षाच्या घटना नेहमीच घडतात. वाघाच्या हल्ल्यात एखाद्याचा बळी गेला नाही असा एक दिवस जात नाही. जंगलात सरपण तसेच रानमेवा गोळा करण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांवर वाघ हल्ला करतो. त्यात गावकऱ्यांचा बळी जातो. उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रात आतापर्यंत चार जणांचे बळी घेणाऱ्या एसएएम–II या वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. गेल्या २८ जून, १६ ऑगस्ट, १७ ऑगस्ट व ४ नोव्हेंबर रोजी एसएएम- II या वाघाने चार जणांचे बळी घेतले हाेते. तेव्हापासून या वाघावर वन विभागाने लक्ष केंद्रित करण्यात आले.
‘कॅमेरा ट्रॅप’मध्ये टिपलेल्या छायाचित्रांनुसार चार जणांचे बळी घेणारा वाघ एसएएम-II हाच असल्याचे निष्पन्न झाले होते. एसएएम-II वाघाचा ब्रम्हपुरी उपक्षेत्रातील शेत शिवारात नियमित वावर असल्याने त्याला जेरबंद करण्याची कार्यवाही सुरू होती. मंगळवारी, ८ नोव्हेंबर रोजी एसएएम- II वाघास ब्रम्हपुरी उपक्षेत्रातील कक्ष क्रमांक ११८ मध्ये सायंकाळी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी ‘डार्ट’ करुन बेशुद्ध केले. यानंतर वन विभागाने वाघाला पिंजऱ्यात जेरबंद केले. यावेळी वन विभागाचे संपूर्ण पथक उपस्थित होते.
जिल्ह्यात वन्यजीव आणि मानव संघर्षात मोठी वाढ झाली आहे. दर एक-दोन दिवसात वाघाच्या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे. ब्रम्हपुरी परिसरातील जंगलात वाघांच्या हल्ल्यात मनुष्यहानीच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. लाेकांनी एकट्याने जंगलात जाऊ नये, जायचे असल्यास वन विभागाला सूचना द्यावी, असे आवाहन वन विभाग वारंवार करते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत लोक जंगलात जात असल्याने वाघाच्या हल्ल्यात बळी पडण्याच्या घटना घडतात. गडचिरोली जिल्ह्यातही वाघाची दहशत होती. हा वाघही जेरबंद करण्यात आला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.