आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापावसाळा सुरू होऊन दोन आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. मृग नक्षत्र संपून आर्द्रा नक्षत्राचे आगमन झाले आहे. तरीही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने भरपावसाळ्यातही पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. तालुक्यातील ९ गावे व १४ वाड्यांना राेज दहा टँकरच्या मदतीने २१ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. आत्तापर्यंत झालेल्या पावसाने विहिरींना पाणी उतरलेले नाही. पुढील दिवसात अपेक्षित पाऊस पडला तरच टँकरची संख्या कमी होण्याचा अंदाज आहे.
तालुक्यात कजवाडे व रामपुरा या गावांना एप्रिल महिन्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला होता. हा पुरवठा आजही कायम आहे. टंचाईच्या झळा सोसणाऱ्या गावांना मागणीनुसार लोकसंख्या विचारात घेऊन फेऱ्यांचे नियोजन करत पाणी दिले जात आहे. पावसाळा सुरू झाल्याने टँकरची संख्या घटण्याचा अंदाज होता. मात्र, अनेक भागात समाधानकारक पाऊस नसल्याने पाणीटंचाई कायम आहे. आटलेल्या जलस्रोतांना पाणी उतरण्यायोग्य पाऊसच पडलेला नाही. मागील आठवडा कोरडा गेला होता. आता दोन दिवसांपासून पावसाची संपूर्ण तालुकाभर हजेरी लागली आहे. यात काही दिवस सातत्य राहिले तरच विहिरींना पाणी उतरले. अन्यथा अजून काही दिवस टँकरचा पाणीपुरवठा कायम ठेवावा लागणार आहे. तालुक्यात एकूण सरासरी ९८.८२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
अहवालांची मागणी
काही भागात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. सध्याच्या जलस्राेतांच्या स्थितीविषयीचाअहवाल मागविण्यात आला आहे. गारेगावला विहिरीला पाणी उतरले आहे. त्यांचा अहवाल शुक्रवारी प्राप्त हाेईल. यानंतर येथील टँकर बंद केले जाईल. अन्य गावांच्या अहवालावरून निर्णय घेणार आहाेत. - ज्ञानेश्वर पवार, सहायक,पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.