आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना काळात आरोग्यसेवा दिलेल्या आशासेविका व गटप्रवर्तक यांचे थकीत मानधन एकाच वेळी देण्यात यावे, यासाठी ग्रामपंचायतींना पत्र देण्यात येईल, असे आश्वासन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी कर्मचारी युनियनच्या शिष्टमंडळाला दिले. कोरोनाकाळात आरोग्यसेवा दिलेल्या आशासवेविका व गटप्रवर्तकांना ग्रामपंचायत पातळीवरून प्रति महिना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा असे आदेश राज्य शासनाने काढले होते. मात्र तालुक्यातील आशासेविका व गटप्रवर्तकांना फक्त एकाच महिन्याचे मानधन मिळाले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी सीटू संलग्न नाशिक जिल्हा आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला येथील पंचायत समिती आवारात बिऱ्हाड आंदोलन केले होते. प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी आंदोलकांचा विषय जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापर्यंत नेऊन बैठकीत चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते.
या पार्श्वभूमीवर युनियनच्या शिष्टमंडळाने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची भेट घेतली. त्यांनी शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा केली. तसेच आशा, गटप्रवर्तक यांच्या कोरोना प्रोत्साहन भत्त्याविषयी दुरुस्तीपत्र काढून सदर निर्णय ग्रामपंचायत स्तरावर एकाच वेळी घेण्यात यावा, असे पत्र दोन दिवसांत काढण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी सीटू संलग्न नाशिक जिल्हा आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनचे नेते डॉ. डी. एल. कराड, विजय दराडे, कल्पना शिंदे, चित्रा सोनवणे, शशिकला बच्छाव, मोहिनी मैंद, वृक्षाली बोरगुडे, रत्ना केदारे, मंगल शिंदे आदी उपस्थित होते.
तर जि.प.समोर बिऱ्हाड आंदोलन आशा सेविका व गटप्रवर्तक यांचे दोन वर्षाचे अर्थात प्रत्येकी एकूण २४ हजार रुपये इतके मानधन थकले आहे. जिल्हा प्रशासनाकडून आशा व गटप्रवर्तकांच्या थकीत मानधन संदर्भात पत्र न निघाल्याने दि.१३ फेब्रुवारी पासून जिल्हा परिषद समोर बिऱ्हाड आंदोलन करण्यात येईल असा इशारा युनियनने दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.