आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादारूच्या नशेत वाद घालणाऱ्या मेहुण्याची शालकाने दोरीने गळा आवळून हत्या केली. हा प्रकार कॅम्पातील विजयनगर भागात १५ जून रोजी घडला होता. सुदामा रामनयम गोतम (३५) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याचा अभिप्राय प्राप्त झाल्याने पोलिसांनी शनिवारी खुनाचा गुन्हा दाखल करत संशयित धर्मराज चिन्नीलाल गोतम याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
मूळ उत्तर प्रदेश राज्यातील तिलोली गावचे रहिवासी असलेले सुदामा व धर्मराज शहरातील विजयनगर भागात अर्चित रेसिडेन्सीत वास्तव्यास होते. दोघेही आठवड्यापूर्वीच शहरात आले होते. पेंटर काम करून दोघे आपला उदरनिर्वाह करत होते. सुदामाला दारूचे व्यसन असल्याने त्यांच्यात वाद होत होते. घटनेच्या दिवशी दोघांमध्ये वाद झाले. या वादातून धर्मराजने सुदामाला मारहाण करत दोरीने गळा आवळून त्याचा खून केला.
यानंतर सुदामाचा मृतदेह इमारतीच्या गच्चीवर नेवून झोपलेल्या अवस्थेत टाकून दिला होता. दुसऱ्या दिवशी धर्मराजने सुदामा बेशुद्ध झाल्याचा बनाव करत त्याला सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. दरम्यान, घटनेची माहिती कॅम्प पोलिसांना कळविण्यात आली. सहायक पाेलिस निरीक्षक प्रकाश काळे यांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केली असता डॉक्टरांनी खुनाचा संशय व्यक्त केला होता. शवविच्छेदन अहवालावरून खुनाचा उलगडा हाेताच काळे यांनी संशयित धर्मराजला अटक केली. मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देत संशयित धर्मराजविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.