आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात विजेचे खासगीकरण झाल्यापासून वीजप्रश्न गंभीर बनत चालला आहे. सर्वसामान्य जनता खासगी कंपनीच्या कारभारास वैतागली आहे. कंपनी आपल्या कामात सुधारणा करत नसल्याचा आरोप करत काँग्रेसने जुना आग्रारोड कार्यालयाबाहेर गुरुवारी आंदोलन केले. कंपनीने आपल्या कामात सुधारणा करून जनतेला सुरळीत वीजपुरवठा करावा, अन्यथा मोर्चा काढण्याचा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष एजाज बेग यांनी दिला.
दुपारी बेग यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला. वीज कंपनीने अद्याप पावसाळ्यापूर्वीची कामे केलेली नाहीत. गरज नसताना घरगुती वापराचे जुने मीटर बदलून नवीन मीटर बसविले जात आहेत. बिल वसुलीच्या नावाखाली दडपशाही केली जात आहे. सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे जनता बेजार झाली आहे. याचा परिणाम शहराच्या व्यवसाय व यंत्रमाग उद्योगावर होत आहे. सत्ताधारी कधीच वीज कंपनीविरोधात बोलत नाही.
कंपनीत त्यांची भागीदारी असल्याचा गंभीर आरोपही बेग यांनी केला. वाढीव वीजबिल आकारणी बंद करावी, पाणीपुरवठ्याच्या वेळेत वीजपुरवठा खंडित करू नये, शुक्रवारी सुरळीत वीजपुरवठा करावा, वाढीव बिलांची दुरुस्ती करून द्यावी आदी मागण्यांचे निवेदन कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत मोर्चा इशारा देण्यात आला. याप्रसंगी सिटिझन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मंजूर हसन अय्युबी, जमील क्रांती आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.