आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकरोडमध्ये गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून जुन्या भांडणाची कुरापत काढून कारमधील तिघांनी दुचाकीला धडक देत दुचाकीवरील एकावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले होते. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला समीर पठाण (३४) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूची माहिती मिळताच नाशिकरोडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. ३ रोजी सौभाग्यनगर नाशिकरोड येथे हा प्रकार घडला होता. नाशिकरोड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि श्री ऊर्फ मोन वर्मा (२७, रा. देवळालीगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मित्र समीर पठाण रात्री ११ वाजता मित्र समीर ऊर्फ मुस्तफा पठाण याच्यासोबत दुचाकी एमएच १५ एफके ३४४६ वरून बसून वास्को चौक, नाशिकरोड येथून सौभाग्यनगरकडे पेट्रोल भरण्यास गेले होते. पेट्रोल भरून देवळालीगावाकडे येत असताना नाशिकरोडकडून येणारी गोल्डन रंगाची कार पाठलाग करत असल्याचे समजले. काही वेळात संशयित कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. धडक लागल्याने वर्मा आणि पठाण दोघे दुचाकीवरून खाली पडले.
कारमधून उतरलेल्या संशयित बाळा जाधव, दिनेश जाधव, मयूर बिडवे यांनी समीर पठाणवर हल्ला केला शिवीगाळ करत कोयत्याने वार केले. या हल्ल्यात समीर गंभीर जखमी झाला. समीरला सोडवण्यास गेलेल्या वर्मावर संशयितांनी कोयत्याने हल्ला केला.
सुदैवाने उलटा कोयता मारल्याने गंभीर दुखापत झाली नाही. गंभीर जखमी अवस्थेत पठाणला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ला केल्यानंतर संशयित त्याच कारमधून फरार झाले होते. नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
टोळी युद्धाची किनार
संशयितांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून समीरवर हल्ला केला. या हल्ल्यात समीरचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. संशयितांवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर नाशिकरोड परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.