आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिपीन बाफना खून खटल्याचा निकाल अखेर 11 वर्षानंतर लागला असून, याप्रकरणी दोषी मुख्य आरोपी चेतन पगारे आणि अमन जट यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज फाशीची शिक्षा ठोठावली आहे. न्यायाधीश अदिती कदम यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.
बिपीन बाफणाचे १० जून २०१३ रोजी एक कोटीच्या खंडणीसाठी अपहरण करत आडगाव शिवारात नेऊन खून करण्यात आला होता. याप्रकरणी अक्षय सुळे, संजय पवार, पम्मी चौधरी यांची न्यायालयाने निर्दोष मुक्ततता केली आहे. सरकार पक्षाने ३५ साक्षीदार तपासले. विशेष म्हणजे या खटल्यात एकही साक्षीदार फितूर झाला नाही.
अपहरणानंतर धमकी
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओझर येथील व्यापारी गुलाबचंद बाफणा यांचा मुलगा बिपीन बाफणा हा डान्स क्लासला आला असताना १० जून २०१३ रोजी त्याचे अपहरण करण्यात आले. पंचवटी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बिपीनच्या वडिलांकडे संशयितांनी १ कोटीची खंडणी मागीतली होती. खंडणी न दिल्यास मुलाचे बरे वाईट करण्याची धमकी दिली होती.
नंतर मृतदेह सापडला
बाफणा कुटुंबियांनी पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल केला. १४ जून रोजी आडगाव शिवारात बिपीनचा मृतदेह आढळून आला होता. पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक बाजीराव भोसले, नरेंद्र पिंगळे यांनी संशयित चेतन पगारे (रा. ओझर), अमन जट (रा. केवडीबन पंचवटी), अक्षय उर्फ बाल्या सुळे (रा. नांदुर नाका), संजय पवार (रा. बागवाणपुरा), पम्मी चौधरी यांना अटक केली होती.
आरोपी कारागृहात
संशयितांवर अपहरण, खंडणी आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यात जट टोळीला मोक्का लावण्यात आला होता. संशयित २०१३ पासून कारागृहात आहेत. खुनाच्या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक आयुक्त गणेश शिंदे, वरिष्ठ निरीक्षक बाजीराव भोसले, नरेंद्र पिंगळे, शरद सोनवणे, अजय गरुड यांनी केला. सरकारपक्षा तर्फे अॅड. अजय मिसर यांनी कामकाज पाहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.