आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषदेच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयाेजित करण्यात आलेल्या क्रिडा स्पर्धा 8 लाखाच्या वाढीव तरतुदीमुळे वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
या स्पर्धांसाठी वाढीव तरतुद करण्याबाबत सीईओ आशिमा मित्तल अनभिज्ञ हाेत्या. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वाढीव तरतुदीच्या प्रस्तावाची माहिती देऊन वाढीव रक्कम याेग्य असल्याचे स्पष्टीकरण दिले. दरम्यान प्रशासकीय काळात सुरू असलेल्या या कामकाजावर निवडणूक लढविणारांचे लक्ष असून पुढील काळात प्रशासनाला लाेकप्रतिनिधींचा सामना करावा लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयाेजन करण्यात आले आहे. फेब्रुवारीत हाेणाऱ्या या स्पर्धांसाठी नागरिकांकडून मिळणाऱ्या उपकराच्या रकमेतून अर्थातच सेस मधून10 लाख रूपयांची तरतुद करण्यात आली आहे. मात्र या स्पर्धांसाठीचा खर्च वाढणार असल्याने प्रशासनाने पुन्हा वाढीव 8 लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. एकूणच अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनाेरंजन करण्यासाठी 18 लाख रूपये खर्च करण्याचे नियाेजन करण्यात आल्याने प्रशासनावर टिकेची झाेड उठली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी वाढीव रकमेबाबत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांना विचारणा केली असता त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून किमान 150 स्पर्धक सहभागी हाेणार असल्याने 14 लाख रूपयांपर्यंत खर्च अपेक्षित असून त्यासाठी 8 लाखाचा वाढीव प्रस्ताव तयार केला आहे. मात्र त्यास अद्याप मान्यता मिळालेली नसल्याचे स्पष्टीकरण देऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
कर्मचाऱ्यांमुळे खातेप्रमुख हतबल
आठ वर्षानंतर स्पर्धा होत असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्व कार्यालयांमध्ये क्रीडा स्पर्धेचा माहोल तयार झाला आहे. स्पर्धेसाठी इच्छुक कर्मचारी कार्यालयीन वेळेत सरावासाठी मैदानावर जाऊन सराव करत आहे. त्यामुळे दैनंदिन कामजावर विपरीत परिणाम हाेत आहे. आर्थिक वर्षाच्या आत अर्थातच मार्च महिन्याच्या आत कामांचे नियाेजन करण्यासाठी खातेप्रमुखांची धडपड सुरू आहे. मात्र स्पर्धेच्या सरावामुळे त्यांना मनुष्यबळ उपलब्ध हाेत नसल्यामुळे कामकाजावर परिणाम हाेत आहे. त्यामुळे खातेप्रमुख कमालीचे हतबल झाले आहेत.
प्रशासनाला उत्तर द्यावे लागेल
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा घेतल्या पाहिजेत, मात्र त्यासाठी एवढ्या माेठ्या प्रमाणात खर्च करण्याची आवश्यकता नाही. त्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैज्ञानिक गुणवत्तेसह खेळावर खर्च केल्यास ते उपयुक्त ठरेल. आगामी काळात प्रशासनाला याचे उत्तर द्यावे लागेल.
- डाॅ. आत्माराम कुंभार्डे, माजी भाजपा गटनेते, जिल्हा परिषद
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.