आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासी शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई लाँग मार्च:हक्काच्या मागणीसाठी तापत्या उन्हात, अनवानी पायांनी मार्गक्रमण

नाशिक9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाच्या वाढलेल्या तीव्रतेने तापलेले डांबरी रस्ते...,भेगालळेल्या टाचा अन त्यावर डांबराचे बसणारे चटके...डोक्याला उन लागु नये म्हणुन बांधलेले मुंडासे.., तर महिलांनी डोक्यावर घेतलेला पदर.., पण मनाशी सातबाऱ्यावर वन जमिनी लागल्या पाहिजे यासाठी नाशिक हुन विधानभवनाला घेराव घालण्यासाठी तब्बल पंधरा हजार आदिवासी शेतकऱ्यांच्या वतीने दिंडोरी नाका येथे कांदा, वागे, कोथंबिर रस्त्यावर फेकुन आपला संताप व्यक्त करीत मोर्चाने मुंबईकडे कुच केली.

भारताचा कम्युनिष्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीने नाशिक येथून सोमवारी (दि.१२) सकाळी ११ वाजता माजी आमदार जे. पी. गावीत,डाँ. अजित नवले, डाॅ. डी. एल. कराड यांच्या नेतृत्वाखाली तब्बल पंधरा हजार आदिवासी शेतकरी बांधवाचा मोर्चाला सुरवात झाली. मोर्चामध्ये डोक्यावर लाल टोपी, हातात लाल झेंडा आणि खिशाला बिल्ला लावुन महिला पुरुष केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत, तसेच आमच्या मागण्या मान्य करा या घोषणा देत होते. म्हसरुळ पासुन मोर्चाला सुरुवात झाल्यापासुन रस्त्याची एक बाजु पुर्णपणे बंद करावी लागली होती. मोर्चांची लांबी ही एक ते दिड किलोमीटर असल्याने तोपर्यंत वाहतुक विस्कळीत झाल्याचे दिसुन येत होते.मोर्चेकरी दिंडोरी नाका येथे आले तेव्हा संतप्त झालेल्या मोर्चेकऱ्यांनी कांदे, वागे, कोथंबिर, टोमँटोला दर मिळत नाही, म्हणुन रस्त्यावर ओतुन शासनाचा निषेध केला. दिंडोरी नाका येथे जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेवुन मोर्चा थांबविण्याबाबत विंनती केली, तसेच यावेळी माजी आमदार जे पी गावीत यांच्यासोबत पालकमंत्री दादा भुसे यांनी दुरध्वनीवरुन संपर्क साधुन दिला असता, पालकमंत्री भुसे यांनी मोर्चेकऱ्यांच्या १५ जणांच्या समितीला मंगळवारी दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महत्वाच्या मंत्र्यासोबत चर्चासाठी निमंत्रण दिले आहे. गावीत यांनी मंगळवारी बैठकीला उपस्थित रहाणार असल्याचे सांगितले, परंतू मोर्चा हा सुरुच रहाणार असल्याचे सांगितले.त्यानंतर पोलीसांनी मोर्चेकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागविला असता, तेव्हा पाणी घेण्यासाठी आदिवासी बांधवाची गर्दी झाली होती. मोर्चा हा आडगाव नाका मार्गे द्वारका, मुंबई नाका, पाथर्डी फाटा मार्गे विल्होळी येथे मुक्कामी थांबला. मंगळवारी सकाळी पुन्हा विधानभवनाच्या दिशेने रवाना होणार आहे. दरम्यान निमाणी परिसर, जुना आडगाव नाका, द्वारका, मुंबई नाका, इंदिरा नगर, राणेनगर आणि पाथर्डी फाटा येथे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. बंदोबस्तासाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा लावण्यात आला होता. द्वारका येथे पोलीसांच्या वतीने पाणी वाटप करण्यात आले होते. मोर्चात इंद्रजित गावित, सीताराम ठोंबरे, सावळीराव पवार, सुभाष चौधरी यांच्यासह आदी पदाधिकारी सहभागी झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...