आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजैन धर्मीयांच्या २० तीर्थंकरांची मोक्षभूमी म्हणून प्रसिद्ध असलेले अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजीची पवित्रता धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणूनच कायम ठेवली जाईल. हे ठिकाण पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले जाणार नाही, असे आश्वासन केंद्रीय पर्यटन व संस्कृतीमंत्री जी. किशन रेड्डी यांनी अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले.
अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय पर्यटन व संस्कृतीमंत्री यांच्याबरोबरच्या बैठकीत केलेल्या चर्चेनंतर त्यांनी हे आश्वासन दिले. श्री सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र हे भारतभरातल्या समस्त जैन समाजाचे सर्वोच्च श्रद्धेचे तीर्थक्षेत्र असून झारखंड सरकार व केंद्र सरकारच्या परिपत्रकामध्ये पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्याची शिफारस करण्यात आल्याने देशभरातल्या जैन समाजात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. सरकारच्या या प्रस्तावित निर्णयाविरुद्ध देशभरात मोठ्या प्रमाणात आंदोलने होत आहेत.
या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी, हितेंद्र मोता, संदीप भंडारी, बिपिन जैन, जे. के. जैन आदी पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे रेड्डी यांच्याबरोबर आयोजित बैठकीत सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र हे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्याची मागणी केली. तसेच या तीर्थाची पवित्रता भंग होईल असा कोणताही निर्णय सरकारने घेऊ नये, अशी भूमिका मांडली.
केंद्रीय पर्यटन व संस्कृतीमंत्री जी. किशन रेड्डी यांनी यासंबंधी विस्ताराने चर्चा करून कोणत्याही परिस्थितीत सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र हे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणूनच राहील. या ठिकाणी पर्यटन क्षेत्र घोषित करण्यात येणार नाही याबाबत जैन समाजाने खात्री बाळगावी, यासंबंधी आवश्यक त्या स्पष्टीकरणाचे आदेश निर्गमित केले जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जी. किशन रेड्डी यांनी दिलेल्या आश्वासनामुळे जैन समाजबांधवांत आनंद व्यक्त करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.