आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करात्र्यंबकेश्वर देवस्थान मंदिर पिंडीच्या संवर्धनासाठी गुरुवारपासून १२ जानेवारीपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. यापूर्वी २५ फेब्रुवारी २००७ मध्ये त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग पिंडीची झालेली झीज पाहून भारतीय पुरातत्त्व खात्याने मध्यरात्री वज्रलेप प्रक्रिया कोणतीही वाच्यता न करता केल्याने मोठे वादळ निर्माण झाले होते. यामुळे पिंडीच्या आतील तीन लिंगाच्या रचनेत बदल केल्याने भाविक व पूजक यासह ग्रामस्थ संतप्त होऊन जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे याबाबत तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावेळी केलेली वज्रलेप प्रक्रिया पक्की न झाल्याने दोन चार वर्षांत पिंडीच्या काही भाग निघत असून मध्यंतरी साळुंखाच्या बाजूची कडा निघाल्याचे समजल्याने विश्वस्त मंडळाने पुरातत्त्व खात्याकडे पत्रव्यवहार करत पिंडीवर वज्रलेप प्रक्रिया करावी, अशी विनंती केली.
नोव्हेंबरमध्ये होणारी ही प्रक्रिया ५ ते १२ जानेवारी या कालावधीत होत असून पुरातत्त्व विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली. या विभागातील रासायनिक विभागामार्फत ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी कालावधी निश्चित करण्यात आला. पाैष महिन्यात भाविकांचा ओघ कमी होतो. विभागाचे अधीक्षक मीनलकुमार चावले यांच्यासह मुंबई, नाशिकच्या पुरातत्त्व खात्याचे अधिकारी उपस्थित राहून वज्रलेप प्रक्रिया करतील. १२ जानेवारीस गर्भगृहात जाणारा दरवाजा चांदीच्या आवरणाचा बसवण्यात येईल.
देवस्थानच्या त्रिकाळ पूजा मात्र सुरू राहणार १६ वर्षापूर्वी झालेला गोंधळ पुन्हा हाेऊ नये, यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कुलकर्णी व विश्वस्तांच्या वतीने संबंधित खात्याची परवानगी घेऊन काम सुरू करण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. या देवस्थानच्या त्रिकाळ पूजा मात्र सुरू राहणार आहे. त्यावेळी पुजारी व शागीर्द यांना परवानगी असेल असेही सांगण्यात आले. २००७ फेब्रुवारीमधील वज्रलेप सर्व दृष्टीने वादातीत ठरला होता. त्या वेळी चोक्कलिंगम जिल्हाधिकारी व कमल बजाज जिल्हा पोलिस प्रमुख होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.