आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:अवकाळीचे सावट दोन-तीन दिवसांत होणार दूर, रविवारनंतर तापमान वाढीचा अंदाज

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहादा परिसरात अवकाळी पावसामुळे शेतातील उभ्या केळी पिकाचे झालेले नुकसान. - Divya Marathi
शहादा परिसरात अवकाळी पावसामुळे शेतातील उभ्या केळी पिकाचे झालेले नुकसान.

राज्यात ४ मेपासून अवकाळी पावसाची तीव्रता काहीशी कमी झाली असून रविवारपर्यंत (७ मे) तुरळक ठिकाणी अगदी किरकोळ पावसाची शक्यता आहे. त्यानंतर राज्यात हळूहळू दिवसाच्या तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता असली तरी कमाल तापमान सरासरीइतकेच राहण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवलली आहे.

राज्यात एक महिन्याहून अधिक काळ वारा खंडिता प्रणाली असल्याने अवकाळीचे संकट निर्माण झाले आहे. परंतु, सध्या या प्रणालीची तीव्रता काही प्रमाणात कमी होण्याच्या मार्गावर आहे.

दक्षिण अंदमान बेटांच्या पश्चिम किनारपट्टीसमोर बंगालच्या उपसागरात ९ मेच्या दरम्यान चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत असून राज्यावर त्याचा विशेष परिणाम जाणवणार नाही. दरम्यान, गुरुवारी नाशिक जिल्ह्यासह परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, ठाणे, सातारा या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. या वेळी वाऱ्याचा वेग ताशी २० ते २५ किलोमीटर होता.

खान्देशला तडाखा; ज्वारी, बाजरी, केळीचे पीक आडवे
खान्देशातील नंदुरबार जिल्ह्याला गुरुवारी पावसाने झोडपून काढले. नंदुरबार शहरासह नवापूर, शहादा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरांत वऱ्हाडी मंडळींची धावपळ उडाली. शहादा तालुक्यात विवाह स्थळावरील मंडपांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय उन्हाळी ज्वारी, बाजरीसह केवळी, पपई पिकांचे नुकसान झाले. जळगाव जिल्ह्यातील जामनेर व बोदवड तालुक्यालाही वादळाचा तडाखा बसला. मागील दिवसांपासून जामनेर तालुक्यात वादळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले.

नांदेड, छत्रपती संभाजीनगरसह नाशिक जिल्ह्यात धुवाधार
बुधवारी-गुरुवारी नांदेड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झाेडपले. पैठण शहरासह जायकवाडी, बिडकीन, वाहेगाव, वैजापूर, साेयगाव, गंगापूर तालुक्यात पावसाने पिकांचे नुकसान झाले.

नाशिक जिल्ह्यात मालेगाव, मनमाड, घाेटी व हरसूल परिसराला गुरुवारी मुसळधार पावसाचा तडाखा बसला. यात कांद्यासह इतर पिकांचे तसेच चाऱ्याचे मोठे नुकसान झाले अाहे.