आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृष्णा खोऱ्यात बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, वेदगंगा आदी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. सांगलीजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी २३ फुटांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. दरम्यान, कृष्णेवरील कर्नाटक सरकारच्या हिप्परगी धरणातून ७२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने सर्व नद्यांतील पाण्याची पातळी सहा तासांत कमी होईल, अशी माहिती सांगली पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.
मान्सूनच्या या पहिल्याच पावसाने दक्षिण महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. दक्षिण महाराष्ट्रातील नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. याबरोबरच शनिवारपासून कोयना धरण पायाच्या विद्युतगृहामधून २१०० क्युसेक पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीकाठची शहरे धास्तावली आहेत.
कोल्हापूर : पंचगंगा नदी धोकादायक पातळीकडे, नदीकाठची गावे सतर्क
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू झाली आहे. तीन दिवस पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात तळ ठोकला असून पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. पाणीपातळी ३३.४ फुटांवर पोहोचली आहे. पंचगंगेची इशारा पातळी ३९ असून धोकापातळी ४३ फूट आहे. जिल्ह्यातील ५८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे. शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी पोहोचल्याने दक्षिणद्वार सोहळा साजरा झाला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेला पाऊस अद्याप कमी झालेला नाही. पाणीपातळी वाढत चालल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. महापुराचा धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे. महापुराचा धोका असलेल्या गावात स्वयंसेवक, बोटी तसेच लाइफ जॅकेट आदी सामग्री तयार ठेवली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाद्वारे पावसाची तसेच पाणीपातळीची माहिती दिली जाते. १२०० स्वयंसेवकांची फौज पूरपरिस्थितीसाठी तयार आहे. रबर मोटार बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या संरक्षणासाठी ९०० लाइफ जॅकेट, ७०० लाइफ रिंग, रोप अशी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफच्या तीन तुकड्यांना पाचारण करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे.
सातारा: पावसाचा जोर कायम
जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातून कोयना नदीपात्रात २१०० क्युसेक पाणी आज सकाळी ११ पासून सोडायला सुरुवात झाली आहे. तसेच सातारा तालुक्यातील उरमोडी धरण पाणलोट क्षेत्रात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू असल्याने उरमोडी धरणाचे चारही वक्र दरवाजे वर उचलले असून त्यातूनही १४१३ क्युसेक व कालव्यातून शंभर क्युसेक तसेच एकूण विसर्ग १५१३ क्युसेक विसर्ग सुरू आहे.
सातारा - मुसळधार पावसामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेला कोयनानगरजवळील ओझर्डे धबधबा कोसळत आहे.
राज्यातील अनेक शहरांमध्ये सध्या जोरदार पाऊस पडत आहे. कोकणातही सर्वदूर जलधारा कोसळत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा,पुण्यासह इतर शहरांत धुवाधार पाऊस पडत आहे. मुंबईत आणि उपनगरातही गेल्या दोन दिवसांपासून वरुणराजाने चांगलाच तडाखा दिला आहे. त्यामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे.
सांगली: कृष्णेची पातळी २३ टक्के, वारणा दुथडी
आहेत. या भेटीत राज्यातील भीमा व कृष्णा खोऱ्यातून सोडला जाणारा विसर्ग व त्याच्या माहितीचे अादानप्रदान करण्याची यंत्रणा दोन्ही राज्यांच्या धरण व्यवस्थापन व पूरनियंत्रणाबाबत संयुक्त आराखडा व कार्यप्रणाली निश्चित केली जाणार आहे. आता यावर कर्नाटक सरकार काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.
जयंत पाटील येदियुरप्पांच्या भेटीला
सांगली, कोल्हापूर व सातारा या जिल्ह्यांत २०१९ मध्ये आलेल्या पुराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सांगलीचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांना तातडीने भेटण्यासाठी रवाना झाले आहेत. या भेटीत राज्यातील भीमा व कृष्णा खोऱ्यातून सोडला जाणारा विसर्ग व त्याच्या माहितीचे अादानप्रदान करण्याची यंत्रणा दोन्ही राज्यांच्या धरण व्यवस्थापन व पूरनियंत्रणाबाबत संयुक्त आराखडा व कार्यप्रणाली निश्चित केली जाणार आहे. आता यावर कर्नाटक सरकार काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.