आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील कुडाळ निवजे येथील ८० वर्षीय आजी लक्ष्मी पालव यांनी आपल्या कुटुंबासह रांगणागड पायी चालत अवघ्या सव्वादोन तासांत सर केला आहे. समुद्रसपाटीपासून या गडाची उंची २२२७ फूट आहे. खडकाळ आणि जंगलातील पायवाट असल्याने हा गड सामान्य माणसाला चढून जाणे अत्यंत कठीण समजले जाते.
सिंधुदुर्गातील कुडाळ निवजे येथील ८० वर्षीय आजी लक्ष्मी पालव यांनी आपल्या कुटुंबासह रांगणागड पायी चालत अवघ्या सव्वादोन तासांत सर केला. सायंकाळी आजीबाई त्याच जोमाने गडावरून पुन्हा खाली उतरल्या. या वयातील मोठ्या जिद्दीने त्यांनी केलेला हा प्रवास थक्क करणारा आहे. लक्ष्मी पालव यांच्या वारंग आणि पालव या दोन्ही कुटुंबांतील नातवंडांनी रांगणागडावर जायचा बेत आखला. त्यांच्या नियोजनात कुटुंबातील सर्वांनी मिळून गडावर एक दिवसाची सहल काढण्याचे निश्चित केले. नातवंड आणि पतवंडांनी आपल्या आजीला सोबत गडावर येण्याचा आग्रह धरला. आजीनेही मोठ्या उत्साहाने होकार दिला.
आजी आपल्या सोबत येणार म्हणून नातवंडे, पतवंडे यांचा आनंद द्विगुणित झाला. ठरलेल्या तारखेनुसार सकाळी आठ वाजता आपल्या तीन पिढ्यांच्या कुटुंबासमवेत शिवाजी महाराजांच्या जयघोषात लक्ष्मीआजींनी गडावर चढायला सुरुवात केली. त्यांचे एक-एक पाऊल गडाच्या दिशेने मार्गक्रमण करीत होते. नातवंडे, पतवंडांसोबत वाटेतील एक वेगळा आनंद घेत लक्ष्मी आजींनी थकवा जाणवू न देता सव्वादोन तासांत गड सर केला. कुटुंबासोबत गडावर मौजमजा करीत त्या सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास परतीच्या प्रवासाला निघाल्या. दोन-सव्वादोन तासांत त्यांनी पुन्हा गड उतरून या वयातही यशस्वी केलेली रांगणागडाची सफर सर्वांनाच अचंबित करणारी आहे.
आजींनी सांगितले आपल्या तंदुरुस्तीचे रहस्य
घावनळे गावचे उपसरपंच दिनेश वारंग यांच्या लक्ष्मी पालव या आजी आहेत. पालव आजी यांची घरची शेती असून अजूनही त्या शेतात काम करायला जातात. या वयातही त्या निरोगी आहेत. त्यांचा हा प्रवास तरुणाईला लाजवणारा असाच आहे. आपण एक-दोन वेळच बसलो. मात्र, बाकी लोक ठिकठिकाणी बसत, आराम करत चालत होते, असे या वेळी या आजींनी बोलताना सांगितले. सकाळी वेळेत उठणे, शेतात काम आणि चांगला आहार घेणे हेच तंदुरुस्तीचे रहस्य आहे.
ताराबाई या गडावर होत्या वास्तव्यास
सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या सीमेवर रांगणा हा दुर्गम असा गड आहे. समुद्रसपाटीपासून या गडाची उंची २२२७ फूट आहे. औरंगजेबाला दख्खन मोहिमेत हा किल्ला जिंकता आला नाही. वारणेच्या तहानुसार रांगण्याचा ताबा करवीरकर छत्रपतींकडे आला. शाहू-ताराबाई संघर्षात पन्हाळयावरून निघून ताराबाई या गडावर वास्तव्यास आल्या होत्या. सन १७०८ मध्ये सातारकरांनी गडास वेढा दिला, त्या वेळी ताराबाईंना सिंधुदुर्गावर पाठवून रामचंद्रपंत अमात्य व पिराजी घोरपडे यांनी किल्ला ३ महिने लढवला. पावसाळा सुरू झाल्यामुळे छत्रपती शाहूंनी वेढा आटोपता घेतला.
करवीरकरांचे महास्थल म्हणून या गडाचा होतो उल्लेख :
सावंतवाडीकरांवर दबावासाठी करवीरकरांच्या दृष्टीने रांगण्याला महत्त्व होते. जिव्हाजी विश्राम यांनी फितुरीने रांगणा हस्तगत केला. परंतु करवीरकरांचा निधड्या छातीचा वीर सुभान यशवंतराव शिंदे यांनी अडीच महिने झुंज देऊन गड हस्तगत केला. करवीरकरांचे महास्थल म्हणून या गडाचा उल्लेख त्या वेळच्या कागदपत्रांत वारंवार येतो. सावंतवाडीकरांनी करवीरकरांशी एकनिष्ठ राहण्याचे ठरवले व रांगणा इंग्रजांचे राज्य येईपर्यंत करवीरकरांकडे राहिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.