आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्ली विमानतळावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट झाली आहे. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेवर शिक्कामोर्तब करूनच शिंदे पहाटे 5 वाजता औरंगाबादेत परतले आहेत. दिल्लीविमानतळाच्या व्हीआयपी कक्षात या दोन्ही नेत्यांमध्ये 45 मिनिटे चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान एकनाथ शिंदेंनी कालही केलेल्या दिल्लीवारीत ते एकटेच गेले होते. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजपचा एकही नेता दिल्लीदौऱ्याला सोबत नव्हता.फडणवीसांना टाळून शिंदे यांच्या फडणवीस यांच्यासोबत भेटी होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वैजापूरला जाहीर सभा सुरू असतानाच शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दिल्लीतून आदेश आला आणि मुख्यमंत्री तातडीने चिकलठाणा विमानतळावरून दिल्लीकडे रवाना झाले. त्यांचा दौरा मंत्रिमंडळ विस्तारासाठी असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी पहाटेपूर्वी ते औरंगाबादला परततील. त्यांचे सिल्लोड येथील सभा आणि आमदार कार्यालय भेटीगाठींचे नियोजित कार्यक्रम होतील, असे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले.
महाराष्ट्राचा मंत्रिमडळ विस्तार महिनाभरापासून चर्चेत आहे. कुणाच्या वाट्याला कोणते खाते हे ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सातत्याने दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. त्यात शनिवारच्या वारीची भर पडली आहे. पूर्वनियोजित दौऱ्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता मालेगाव येथून वैजापूरला दाखल झाले होते. तेथे त्यांनी आमदार रमेश बोरनारे यांनी आयोजित केलेल्या जाहीर सभेत 35 मिनिटांपेक्षा अधिक वेळ भाषण केले. सभा संपल्यावर मुख्यमंत्री काही वेळ स्थानिकांना देतील. काही जणांशी चर्चा करतील, असे सांगण्यात आले होते.
सभा सुरू असताना मिळाला निरोप
सभा सुरू असतानाच अनपेक्षितपणे माजी उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत, माजी कृषिमंत्री दादा भुसे, माजी रोहयो मंत्री संदिपान भुमरे मंचावर आले. आणि ‘मला दुसऱ्या कामाला जायचे आहे. त्यामुळे कार्यक्रम लवकर आटपू’ असे म्हणत मुख्यमंत्री त्यांच्यासोबत वैजापुरातून बाहेर पडले. समृद्धी महामार्गावरून 45 मिनिटांत ते चिकलठाणा विमानतळावर दाखल झाले. तेव्हा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे यांनी त्यांचे स्वागत केले.
विस्ताराचा घोळ मिटेना : मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे दोघेच राज्याचा कारभार पाहत आहेत. राज्यात अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला. मात्र पालकमंत्री नसल्यामुळे नुकसान पाहण्यासाठी कुणी मंत्री जात नाहीत. तसेच मंत्री नसल्यामुळे सर्व कामे खोळंबली असल्यामुळे राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. त्यामुळे यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक झालेली आहे. दिल्लीत तातडीने मंत्रिमंडळ बैठक तसेच न्यायालयात होणारी सुनावणी यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
पहाटेपूर्वीच परतणार - आमदार शिरसाट
आमदार संजय शिरसाट म्हणाले की, मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन पहाटेपूर्वीच परत येणार आहेत. त्यांच्या रविवारच्या कार्यक्रमांत बदल झालेला नाही. रविवारी सकाळी 10 वाजता विभागीय आयुक्तालयात आयाेजित बैठकीत ते मराठवाड्यातील नुकसानीचा व रखडलेल्या विकासकामांचा आढावा घेणार आहेत.
झटकन निर्णय घेणार- शिंदे
लोकांकडून मागण्यांचे कागद घ्यायचे आणि जवळ ठेवायचे हे मला अजिबात जमत नाही. आलेल्या कागदावर झटकन निर्णय घेऊन विषय संपवणे, हीच माझी कामाची पद्धत आहे. त्यामुळे यापुढे तुमची जी काही कामे असतील ती तातडीने मार्गी लागतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिली. वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. पंचगंगा उद्योग समूहाच्या खासगी साखर कारखान्याच्या पायाभरणी कार्यक्रमात ते बोलत होते. रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, वैजापूरची एमआयडीसी, शनिदेवगाव येथील प्रलंबित बंधारा आदी कामे मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.