आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्षपूर्ण झाले आहे. यानिमित्ताने शिवसेना नेते आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यात मुख्यमंत्र्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर भाजपनेही शिवसेनेवर पलटवार केला. 'भारतीय जनता पार्टी एकटी सर्वाना पुरून उरली आहे, त्यामुळे त्याचा थयथयाट अपेक्षित आहे,' अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'जो समर्थ माणूस असतो, त्याला शत्रू जास्त असतात. भारतीय जनता पार्टी एकटी सर्वांना पुरून उरली आहे, त्यामुळे त्याचा थयथयाट अपेक्षित आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हेच वेगवेगळी विधाने करुन मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणतात. पण, मुख्यमंत्र्यांना राऊतच जास्त प्रिय आहे' , असा टोलाही पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
पाटील पुढे म्हणाले की, 'सर्वसामान्य हिंदू जाणतो की या देशात हिंदूंचे रक्षण 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाल्यानंतर झाले. संघाने ज्या प्रकारे हिंदू संघटित केला त्यातून हिंदू समाजाचे रक्षण झाले, त्यातून हिंदू एकत्रित झाले, ताकद निर्माण झाली आणि त्यांनतर वेगवेगळ्या प्रकारचे जातीय दंगे संपले. हिंदुत्व कोणाचे बेगडी आणि कोणाचे दलालांच आहे हे सर्वसामान्य हिंदूला जावून विचारा,' असा हल्लाबोलही पाटलांनी केला.
पाटील पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीचे राज्यातील सरकार अपयशी व असंवेदनशील असून सरकार मधील तीनही पक्षातील नेत्यांच्या विसंवादामुळे गोंधळलेले महाविकास आघाडी सरकार आहे. या सरकारचा भाजपला काही फरक पडत नाही. विधानसभेत 105 आमदार आहेत. खासदार आहेत. केंद्रात सरकार आहे. सर्वसामान्य माणसाचे मात्र या सरकारमुळे प्रचंड नुकसान होत आहे. '
'उद्धव ठाकरेंबद्दल आकस नाही. मात्र महाराष्ट्राचे प्रश्न कोणते? प्रश्नांचे अनेक प्रकार आहेत. उद्धवजींना या प्रश्नांचा अभ्यास नाही. शरद पवारांनी अचानक त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. उद्धवजींना मंत्रालय कुठे आहे, हेही माहित नव्हते. कामकाज कसे होते हे माहित नाही. देवेंद्र फडणवीस 5 वेळा आमदार, त्याआधी नगरसेवक होते. त्यांना अनुभव होता. मी पहिल्यांदा मंत्री झालो. मी रात्री 3/3 वाजेपर्यंत अभ्यास केला. नरेंद्र मोदीही अचानक मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांनीही अभ्यास केला. उद्धव ठाकरे यांनीही आपला अभ्यास वाढवायला हवा. मी अनेकदा विरोधी पक्षाचा नेता म्हणून प्रश्न विचारले. त्याचे उत्तर त्यांनी मला अनेकदा दिली नाहीत. सर्वसामान्य माणसाला जाणून घ्या', असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
'आमच्या कुणाच्या चौकशा लावायच्या असतील तर ते खुशाल लावू शकतात. त्यांना घटनाच मान्य नाही असे दिसतेय. सुप्रीम कोर्टाचाही निर्णय त्यांना मान्य नसतो. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, तो चांगला आणि अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय दिला तर तो चुकीचा, असे कसे चालेल?'
'ईडी वाढीव संपत्ती आणि मनी लॉड्रिंगची चौकशी करते. आमच्या कुणाचे काही असेल तर तसे तुम्ही माध्यमात कागदपत्रे द्या. तुम्हाला तुमची माणसं टिकवता येत नाहीत, हे मान्य करावे', असेही पाटील म्हणाले.
तर सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होतील....
चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्याचं नेतृत्व करण्याची वेळ येईल त्यावेळी शरद पवार सुप्रिया सुळें यानाच मुख्यमंत्री करतील, असे माझे विश्लेषण आहे. ते चुकीचे नाही. त्यांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करावं वाटणं हे चूक नाही, असेही ते म्हणाले. यावेळी 80 तासाच्या सरकारआधी बैठकीत काय घडलं होते यावर बोलणे चंद्रकांत पाटील यांनी टाळलं.
लवकरच शरद पवारांवर पीएचडी करणार....
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे खूप हुशार नेते आहेत. त्यांच्यावर माझा अभ्यास सुरू असून लवकरच शरद पवार यांच्यावर मी पीएचडी करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच पाटील यांनी यावेळी आघाडी सरकारसह काँग्रेस नेतृत्वावरही टीका केली. तरूण कार्यकर्त्यांना काँग्रेस नेत्यांवर विश्वास नाही. सत्य जास्त दिवस लपून राहत नाही हे काँग्रेसने मान्य करावे आणि काँग्रेसला लोक टिकवून ठेवता येत नाहीत असा टोलाही पाटील यांनी लगावला. याबरोबरच सध्या राज्यात गाजत असलेल्या वीज बीलावरही पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले, सरकामध्ये कोणत्याच कामावरून समन्वय नाही. एकाच विषयावर दोन मंत्री वेगवेगळे वक्तव्य करत असतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.