आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या वसुलीच्या आरोपांच्या चौकशीचे आदेश हायकोर्टाने सीबीआयला दिले. सीबीआयला यासंदर्भात 15 दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यानंतर अडचणीत सापडलेल्या अनिक देशमुख यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत.
गृहमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान आणि कार्यालयातून 100 कोटी वसुली प्रकरणातील पुरावे नष्ट केले जात असल्याचा खळबळजनक आरोप भातखळकर यांनी केला आहे. भातखळकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन म्हटले 'मी अत्यंत जबाबदारीने सांगू इच्छितो की नुकताच राजीनामा दिलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थान आणि कार्यालयात असलेले 100 कोटीच्या प्रकरणा संदर्भातील पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू आहे. CBI ने तातडीने आवश्यक कारवाई करावी', असे ट्वीट भातखळकर यांनी केले आहे.
अनिल देशमुखांच्या राजीनामा
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची माहिती दिली. न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली, या बैठकीला अनिल देशमुखही उपस्थित होते. यावेळी अनिल देशमुखांनीच पवारांकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर शरद पवारांनी होकार दिला. यानंतर देशमुखांनी राजीनामा दिला असून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला ते निघाले आहेत, असे मलिक यांनी सांगितले. तसेच, सीबीआयची चौकशी चालू असताना पदावर राहणे योग्य नसल्याचे सांगून देशमुख यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे मलिक यांनी सांगितले.
काय होते परमबीर सिंह यांचे आरोप
परमबीर सिंह यांनी आपली मुंबई पोलिस आयुक्त पदावरून बदली होताच लेटर बॉम्ब टाकले होते. त्या पत्रामध्ये त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा खळबळजनक आरोप केला होता. निलंबित API सचिन वाझेला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट देण्यात आले होते असा दावा परमबीर सिंह यांनी केला होता. याचीच तक्रार केल्याने आपली बदली करण्यात आली असेही ते म्हणाले होते. परमबीर सिंह यांनी दावा केला होता, की गृहमंत्री देशमुख सचिन वाझेसोबत बंगल्यावर वारंवार बैठका घेत होते. याच दरम्यान 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट वाझेला देण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.