आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली शहरातून रात्रीच्या वेळी चोरीछुपे वाळूची वाहतुक करणारे पाच टिप्पर मंगळवारी ता. ४ रात्री आठ वाजता पकडण्यात आले आहे. पाचही टिप्पर जप्त करून शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून या प्रकरणात चालकांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.
हिंगोली जिल्हयातून मागील काही दिवसांत रात्रीच्या वेळी वाळूची वाहतूक केली जात होती. विशेष म्हणजे लिलाव झालेल्या घाटावरून सायंकाळी सहा नंतर वाळूची वाहतूक करता येत नाही. तसेच वाहन चालकांकडे पावती असणे आवश्यक आहे. मात्र वाळू माफीयांकडून बिनधास्तपणे एकाच पावतीवर अनेक वाहने चालवती जात असल्याचे दोन दिवसांपुर्वीच दोन टिप्पर पकडल्यानंतर उघडकीस आले होेते. टिप्पर चालकाकडे बनावट पावत्या असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी वाळू माफीयांविरुध्द मोहिम सुरु केली.
दरम्यान, आज रात्री आठ वाजता पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक पंडीत कच्छवे, उपनिरीक्षक नितीन केनेेकर यांच्यासह जमादार शेख शकील, गजानन होळकर, दिलीप बांगर, सुधीर ढेंबरे यांच्या पथकाने रात्री आठ वाजता शहरातून जाणाऱ्या मुख्य मार्गावर वाहनांची तपासणी सुरु केली. यामध्ये नांदेडनाका येथे वाळूची वाहतुक करणारे दोन टिप्पर आढळून आले. तसेच खटकाळी रोड भागात तीन टिप्पर वाळूची वाहतुक करतांना आढळून आले. पोलिसांनी पाचही टिप्पर जप्त करून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात आणले असून रात्री उशीरा पर्यंत टिप्पर चालक व त्यांच्याकडे असलेल्या पावत्यांची चौकशी केली जात होती. पोलिसांच्या या मोहिमेमुळे वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.