आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकळमनुरी तालुक्यातील येलकी येथे ओढ्याला पुर आल्यानंतर त्यातून तीन वर्षात तब्बल ५०० जणांची पुराच्या पाण्यातून सुखरूप वाहतुक करणाऱ्या येलकी येथील तरुणाचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. बुधवारी ता.८ पहाटे ऊसाच्या फडात अडकलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह सापडल. लखन प्रकाश गजभारे (२३) असे या तरुणाचे नांव आहे.
कळमनुरी तालुक्यातील येलकी या गावाजळूनच ओढा वाहतो. या ओढ्याचे पाणी पुढे कयाधू नदीला जाऊन मिळते. त्यामुळे कामठा फाटा येथून येलकी, बेलथर, गोटेवाडी या गावामधील गावकऱ्यांना गावी येण्यासाठी पावसाळ्यात हा ओढा पार करावा लागतो. या ओढ्यावर पुल असला तरी त्याची उंची कमी आहे. त्यामुळे पावसाळ्यात ओढ्याच्या पाण्यातून गावाकडे जावे लागते.
दरम्यान, या गावातील गावकऱ्यांना दररोजच आखाडा बाळापूर येथे कामासाठी जावे लागले. त्यामुळे पावसाळ्यात या गावकऱ्यांची गावाकडे परत येण्यासाठी मोठी अडचण होते. सदर बाब लक्षात घेऊन लखन गजभारे यांच्यासह इतर मित्रांनी युवक मंडळ तयार केला. पुराच्या पाण्यातही पोहणाऱ्या तरुणांचा यामध्ये समावेश आहे. पावसाळ्यात कामठा फाटाकडून गावाकडे येणाऱ्या गावकऱ्यांना येलकीच्या ओढ्याच्या पुरातून सुखरुप येलकी गावाकडे आणण्याचे काम युवक मंडळी करीत आहे. यामध्ये लखनचाही सहभाग आहे. या शिवाय येलकी, बेलथर, गोटेवाडी व परिसरातील गावातील आजारी व्यक्तीला तसेच वयस्कर व्यक्तींना पुरातून कामठ्याफाट्याच्या रस्त्याकडे आणून सोडले जाते.
दरम्यान, मागील तीन वर्षात लखन ने किमान ५०० जणांना या पुरातून ओढ्याच्या एका काठावरून दुसऱ्याकाठावर सुखरुप नेऊन सोडले आहे. मंगळवारी ता. ७ रोजी देखील त्याने हे काम केले. सायंकळी पुरातून येत असतांना अचानक तो पाण्याच्या प्रवाहा सोबत वाहून गेला. त्यानंतर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड यांच्यासह गावकरी भारत देसाई व इतर गावकऱ्यांनी त्याच्या शोध सुरु केला होता. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लखन गजभारे याचा मृतदेह ओढ्यापासून काही अंतरावर ऊसाच्या फडामध्ये अडकलेला आढळून आला. सकाळी त्याचा मृतदेह काढून गावात आणण्यात आला आहे.
मागील तीन वर्षात ५०० जणांना पुराच्या पाण्यातून वाहतुक करीत सुखरुप बाहेर काढणाऱ्या लखनचा मृत्यू गावकऱ्यांना चटका लावणारा ठरला आहे. मयत लखन याच्या पश्च्यात आई, वडिल, तीन भाऊ असा परिवार आहे.
ओढ्याच्या पुलाची उंची वाढवावी ः भारत देसाई, गावकरी ेयेलकी
येलकी गावाजवळ असलेल्या ओढ्यावरील पुल जमीनीलगतच आहे. त्यामुळे पावसाळ्यात कमी पावसातचही त्याला पुर येऊन येलकी, गोटेवाडी, बेलथर या गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे प्रशासनाने या पुलाची उंची वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.