आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोलेबाजी:टाटा ग्रुपचा उद्योगपतींनी आदर्श घ्यावा, खासदार उदयनराजेंनी सुनावले; म्हणाले - अदानींबद्दल शरद पवारांकडून समजून घेणार

सातारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरद पवारांनी उद्योगपती गौतम अदानींच्या केलेल्या समर्थनावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असतानाच आता साताऱ्याचे राज्यसभेचे सदस्य खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील मोठे वक्तव्य केले आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने काम करणाऱ्या टाटा ग्रुपचे देशातील सर्व उद्योगपतींनी अनुकरण करायला हवे, असे उदयनराजेंनी म्हटले आहे.

शरद पवारांनी अदानींचे समर्थन केल्याच्या प्रश्नावर बोलताना 'मला पवार साहेबांकडून समजून घेतले पाहिजे', असा खोचक टोला उदयनराजेंनी मारला. आशिया खंडात हा उद्योजक एक नंबरचा श्रीमंत, परत चौथ्या, पाचव्या क्रमांकावर गेला. याच्यापेक्षा सर्व उद्योजकांनी टाटा ग्रुपचे अनुकरण केले पाहिजे. टाटा ग्रुपने मोठ्या प्रमाणावर रोजगार तर दिलाच परंतु, हॉस्पिटल्स, एज्युकेशनल इन्स्टिट्यूटसच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध केल्या. हा दृष्टिकोन सर्वांनी ठेवला पाहिजे, असे मत उदयनराजेंनी व्यक्त केले.

कोणी ताम्रपट घेऊन आलेला नाही. सातारचा खासदार आणि सातारा-जावळीचा आमदार राष्ट्रवादीचाच असेल, या अजित पवारांच्या वक्तव्याचा उदयनराजेंनी समाचार घेतला. अजित पवार नेमके काय बोलले मला माहित नाही. पण नेहमीप्रमाणे चांगले विचार त्यांनी लोकांना दिले असणार, असा उपरोधिक टोला उदयनराजेंनी मारला. तसेच 'आम्ही सध्या पटावर पट काढतोय', असे सांगत अजितदादांच्या ताम्रपटाच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले.

मी आव्हानाला भीक घालत नाही. आव्हाने कोणाची सीविकारायची हे मी ठरवतो. कोणी काहीही म्हटले तरी लोक मूर्ख नाहीत सुज्ञ आहेत. त्यांच्यामुळेच आमदार, खासदार निवडून जातात. कोणाला निवडून द्यायचे ते लोकांनीच ठरवावे, असा टोला उदयनराजेंनी अजितदादांना लगावला.

साताऱ्याचा पुढचा खासदार व जावळीचा आमदार हा राष्ट्रवादीचा असेल, असे वक्तव्य विरोधी पक्षनेता अजित पवार यांनी केले होते. याबाबत छेडले असता उदयनराजे म्हणाले की, 'जो-तो पक्ष वाढीसाठी बोलत होतो. असल्या कोणत्याही आव्हानांना मी भीक घालत नाही. मागच्या वेळेस पवार साहेबांनी साताऱ्यातून उभे राहावे, असा काही लोकांचा आग्रह होता. त्यावेळी अजितदादाच बोललेले की पवार साहेबांनी इथूनच उभे राहावे. आता त्यांचे सातारा दौरे वाढले असतील, तर चांगलेच आहे. कदाचित साताऱ्यातून निवडणुकीला उभे राहायचे त्यांच्या मनात असू शकते.

कोणी तलवार दिल्यावर म्यानात ठेवायची असते का? बाहेरच काढायची असते. म्हणून बाहेर काढली. कोणाला इशारा द्यायचा म्हणून नाही आणि कोणाला इशारा द्यायचा? इशारा देण्याच्या लेवलची लोक तरी पाहिजेत ना? असा टोला त्यांनी आमदार शिवेंद्रराजेंना लगावला.