आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बैलगाडा शर्यतबंदीमुळे खिलार जातीच्या देशी वंशाच्या बैलांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याने “बैल’ हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्यासाठी नॅशनल अॅनिमल वेल्फेअर बोर्डाची बैठक बोलावण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरिराज सिंग यांच्याकडे केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर घातलेल्या बंदीला बैलगाडा मालक संघटना व महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतींसाठी वापरला जाणारा बैल हा खिलार जातीचा देशी गोवंश असून शेतीकामासाठी त्याचा वापर होत नसल्याकडे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांचे लक्ष वेधले. डॉ. कोल्हे म्हणालेे की, केवळ शर्यतींसाठी वापरण्यात येणारा खिलार बैल सांभाळणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. परिणामी या बैलाची कमी दराने बेकायदा कत्तलीसाठी रवानगी केली जाते.
त्यामुळे खिलार जातीच्या देशी बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून भविष्यात ही देशी बैलांची जात नष्ट होण्याचा धोका व्यक्त केला आहे.
बैल हा संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची गरज
खिलार जातीच्या देशी बैलांचा वंश वाचवण्यासाठी बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठणे आवश्यक आहे. त्यासाठी बैल हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची गरज आहे. त्यामुळे तातडीने अॅनिमल वेल्फेअर बोर्डाची बैठक बोलावून यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.