आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मागील २२ दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यात लॉकडाऊन आहे. त्यामुळे सगळेच होम क्वाॅरंटाइन झाले आहेत. मात्र, या आजारापेक्षा आता ‘कौटुंबिक हिंसाचाराचा प्रादुर्भाव’ अधिक वाढत असल्याचे दिसून येते. त्याबाबत अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. दरम्यान, यापुढे कौटुंबिक हिंसाचार करणाऱ्या व्यक्तीला आता घरात नव्हे तर इन्स्टिट्यूटमध्ये क्वॉरंटाइन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
कोरोनामुळे जिल्ह्यासह संपूर्ण देशात २२ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ३ मेपर्यंत ही संचारबंदी लागू असून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला नाही तर संचारबंदीची मुदत वाढवावी लागेल. तशी वेळ येऊ नये असे वाटत असेल तर नागरिकांनी घरातच थांबावे. मात्र, दुसरीकडे या संचारबंदीमुळे कुटुंबातील सर्वच सदस्य २४ तास घरातच आहेत. त्यामुळे घरात कौटुंबिक कलह वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील २० दिवसांत जिल्हा परिषदेकडे कौटुंबिक हिंसाचाराच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यात ग्रामस्तरीय महिला दक्षता समिती स्थापन केली आहे.
पती-पत्नीचे वाद होण्याचे प्रमाण अधिक आहे. ते थांबविण्यासाठी जिल्हा परिषदेने समिती स्थापन केली. या माध्यमातून पती-पत्नीची भांडणे झाली की, संबंधित पतीराजांना समज देण्यात येईल, तरीही त्याने ऐकले नाहीतर त्याला घरात नव्हे तर थेट पोलिसांच्या मदतीने संस्थात्मक क्वाॅरंटाइन करण्यात येईल.
लॉकडाऊनमध्ये पती- पत्नीत प्रचंड वाद
लाॅकडाऊनमध्ये काही तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी गावपातळीवर महिला दक्षता समिती स्थापन करून, त्यामध्ये ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्या, अंगणवाडी सेविका, बचत गट सांभाळणाऱ्या महिलांचा समावेश आहे. त्यामुळे भांडण झाल्यावर संबंधित पती आणि पत्नीचे समुपदेशन करण्यासाठी जिल्हा पातळीवर हा नियम लागू करण्यात आला आहे. आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.