आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचालनालयाने राज्यातील महाविकास आघाडीच्या मागे चौकशांचे सत्र सुरू केले आहे. यामुळे आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळतेय. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांनी याविषया भाष्य केले आहे. 'ईडीच्या कारवाया म्हणजे राज्यांच्या अधिकारांवर गदा आहे,' असे पवार म्हणाले आहेत.
ईडी कुणाच्या मागे कशी लागेल सांगता येत नाही
शरद पवार म्हणाले की, 'गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये देशात नवीन यंत्रणा लोकांना माहिती झालेली आहे. या यंत्रणांचे नाव म्हणजे ईडी आहे. ही ईडी कुणाच्या मागे कशी लागेल काही सांगता येत नाही. कालच अकोल्यातून भावना गवळी या शिवसेनेच्या खासदार आल्या होत्या. त्यांच्या 3-4 संस्था आहेत. 3 शिक्षणसंस्था आणि एक दुसरी छोटी संस्था आहे. या संस्थांचा व्यवहार देखील 20-25 कोटींच्या आतीलच आहे. मात्र तिथेही ईडीने जाऊन त्यांना त्रास देत असल्याचं त्यांनी सांगितले जात आहे' असे पवार म्हणाले.
'संसदेत ईडीच्या कारवायांचा मुद्दा मांडणार'
ईडीच्या कारवायांचा मुद्दा संसदेत मांडणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. पवार म्हणाले आहेत की, 'ज्या ठिकाणी गैरव्यवहार झालेला असेल, त्यासाठी आपल्या देशामध्ये कमिशन आहेत. याविषयी या कमिशनकडे तक्रार केली जाऊ शकते. राज्य सरकारचे गृह खाते देखील येथे आहे. येथे तपासाची यंत्रणा आहे, तरीही ईडीने त्या संस्थांमध्ये जाऊन हस्तक्षेप करणे म्हणजे हे एका अर्थाने राज्यांच्या अधिकारांवर गदा आणणे आहे. अशा कारवायांचे अनेक उदाहरणे सध्या ऐकायला मिळत आहेत. या गोष्टी मला योग्य वाटत नाही. जेव्हा संसदेचे अधिवेशन सुरू होईल, तेव्हा या गोष्टी मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू' असेही शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.