आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील गणेशोत्सवाला ऐतिहासिक महत्त्व असून कोरोना संक्रमानंतर यंदाचा उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. त्यासाठी प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे. विशेषतः गणपती मंडळांसह भाविकांना जल्लोष करण्यासाठी पाच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकर वाजविण्याची परवानगी देण्यात आली आहे.
दरवर्षी गणपती मंडळांना घ्याव्या लागणारा विविध परवानग्या आता पाच वर्षातून एकदा घ्याव्या लागणार आहेत. महापालिका मंडप शुल्क माफ केले आहे. त्याशिवाय एक खिडकी योजनेअंतर्गत सर्व परवानग्या देण्यात येत आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशिरा केले.
पोलीस आयुक्तालयात आयोजित गणेशोत्सव पदाधिकारी बैठकीत शिंदे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
उंचीचे बंधन नाही
शिंदे म्हणाले, कोरोनामुळे मागील दोन वर्षे विविध उत्सवाला बाधा निर्माण झाली होती. आता मात्र, कोरोना संपुष्टात आला असून सार्वजनिक गणेशोत्सव, दहीहंडी बाबत निर्बंध हटविण्यात आले आहेत. प्रामुख्याने गणपती मूर्तीची उंचीचे बंधन नाही. एक खिडकीद्वारे विविध परवानगी देण्यात येत आहेत. त्याचसोबत मंडप शुल्क माफ, वीज मीटर परवानगी बाबत जिल्हाधिकारी यांनी मंडळांना सहकार्य करण्याची सूचना त्यांनी केली.
पारंपारिक वाद्यास परवानगी
दरम्यान, विसर्जन मिरवणुकीत दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेनंतर मंडळांना पारंपारिक वाद्य वाजवू द्यावेत, पोलिसांनी कारवाई न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उत्सवात नागरिकांना त्रास होणार नाही, वाहतूक अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी मंडळांनी घ्यावी, असेही शिंदे यांनी मंडळांना सूचित केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.