आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''राणा दाम्पत्यांच्या घरासमोर शिवसेनेला आंदोलन करण्याची काय गरज होती? शिवसेना सत्तेत आहे हे ते विसरले, आता त्यांना जनताच बघून घेईल'' असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
पुण्यात आज महापालिकेमध्ये ते आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हनुमान चालिसा, नवनीत राणा या मुद्द्यांवरून शिवसेनेवर निशाणा साधताना ते म्हणाले, नवनीत राणांचे एमआयआर करतानाचे फोटो व्हायरल झाले असले तरीही लीलावती रुग्णालय खासगी आहे. तिथे काय करायचे हे रुग्णालय प्रशासन ठरवेल असे म्हणत शिवसेना परिपक्व पक्ष आहे, हे विसरली आहे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
राणांना हनुमान चालिसा वाचायची होती - चंद्रकांत पाटील
राणा दाम्पत्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसा वाचायची होती. तेव्हा शिवसेनेने त्यांना त्यावेळी सांगायला हवे होते असे करू नका. त्यासाठी नवनीत राणांच्या घराबाहेर निदर्शने करण्याची काय गरज होती? असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. राणा दाम्पत्य हनुमान चालिसा म्हणणार होते, रावणचालिसा नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. या सर्वांवरून शिवसेना जुन्या मोडमध्ये गेली आहे, त्यांच्याकडून दादागिरी सुरू आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
राज्य पोलियांना तक्रार देऊन फायदा नाही
राज्यात कोणत्याही पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात काहीच फायदा नाही. तक्रार लिहण्याआधीच त्यांना 4 फोन येतात असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारकडे तक्रार करणे किंवा न्यायालयात जाणे हेच दोन पर्याय उरले आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. तर 14 तारखेला होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सभेवर टीका करत 15 तारखेला देवेंद्र फडणवीसांची सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.