आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबालगुन्हेगाराच्या खून प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. कोयता आणि चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना बुधवारी घडली. धक्कादायक बाब म्हणजे, एका बाल गुन्हेगाराकडून तीन महिन्यात दोन खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
तन्मय मुकेश इंगळे (वय 17, रा. मांगडेवाडी, कात्रज,पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याच्यावर सहकारनगर पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचा खून करणारे चारही आरोपी 14 ते 17 वयोगटातील आहेत.
नक्की घडले काय होते?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तन्मय आणि आरोपी एकाच परिसरात रहात असल्याने एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यामध्ये बुधवारी दुपारी किरकोळ कारणावरुन वाद झाले. याचा राग मनात धरुन आरोपींनी त्याला जवळील ओढ्याजवळ नेले. तेथे एकाने त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले तर दुसऱ्याने चाकूने खुपसले. त्याला जीवे मारल्यानंतर चौघेही आरोपी कात्रज घाटातील डोंगराकडे पळून गेले.
चारही आरोपी ताब्यात
दरम्यान, भारती विद्यापीठ पोलिसांनी खुनाची खबर मिळाल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तन्मयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. आरोपींचा माग काढत असताना अंमलदार विक्रम सावंत यांना आरोपी डोंगरावर लपून बसल्याची खबर मिळाली. त्यानुसार एक पथक तेथे रवाना झाले. लपून बसलेल्या चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी करता त्यातील दोघांवर अगोदर गुन्हे असल्याचे उघड झाले.
पैशांसाठी तगादा लावल्याने वाद
प्राथमिक तपासात तन्मय हा आरोपींना धमकावून वारंवार पैशाची मागणी करत होता. घटनेच्या दिवशीही त्याने पैशाची मागणी केल्यामुळे वाद झाला. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वर्षा तावडे करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.