आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे शहरातील कोंढवा परिसरात एका महिलेसह तिच्या 4 आणि 6 वर्षांच्या दोन मुलांना जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने दारूच्या नशेत हे खून केल्याचे समोर आले आहे. या घटनेने कोंढवा परिसर हादरले आहे.
अनैतिक संबंधावरुन वाद
बुधवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. आरोपी हा महिलेचा दीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे दुसऱ्या पुरुषांशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून दोघांचा बुधवारी (ता. 5) रात्री वाद झाला. या वादातून आरोपीने महिला तसेच तिच्या दोन मुलांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्यांचे मृतदेह खोलीच्या समोरील पत्र्याच्या शेडमध्ये नेले. तेथे घरातील कपडे बेडशीट व लाकडे यांच्या साह्याने त्यांचे मृतदेह जाळले.
आरोपीला अटक
कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिसोळी भागात ही घटना घडली आहे. आरोपी हा लातूर येथील मूळचा रहिवासी असून सुरक्षा रक्षकाचे काम पिसोळी परिसरात करत होता. याप्रकरणी आरोपी वैभव वाघमारे याला पोलिसांनी अटक केली आहे. तर, आम्रपाली वाघमारे या महिलेसह रोशनी वाघमारे (वय 6), आदित्य वाघमारे (वय 4) अशी मृतांची नावे आहेत.
लग्नासाठीही तगादा
याबाबत पोलीस उपायुक्त विक्रम देशमुख यांनी सांगितले की, अनैतिक संबंधातील वादातून ही घटना घडलेली आहे. लग्न कर म्हणून महिला आरोपीच्या मागे लागलेली होती. मात्र, त्यासाठी तो तयार नसल्याने त्यांच्यात वाद सुरू होते. तसेच, महिलेचे इतरांसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशयही आरोपीला होता. या रागातूनच बुधवारी रात्री आरोपीने महिला आणि तिच्या दोन मुलांना गळा दाबून मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांना एका पत्र्याच्या खोलीत मृतदेह जाळण्यात आलेले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस पुढील तपास करत आहे
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.