आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियान:अस्वच्छ एसटी स्थानकांविषयी ‘सुराज्य अभियाना’ची राज्य सरकारने घेतली दखल, 580 बसस्थानकांची होणार स्वच्छता

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘सुराज्य अभियाना’च्या वतीने गेल्या महिन्यात जळगांव, कोल्हापूर, अमरावती, सोलापूर, पुणे, रायगड, पेण, अलिबाग, तसेच नागपूर येथील बसस्थानकांची दुरावस्था आणि अस्वच्छता दूर करण्यासाठी अभियान राबवण्यात आले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महाराष्ट्र दिनानिमित्त 580 बसस्थानकांची वर्षभर स्वच्छता करण्यासाठी ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान’ हाती घेतले आहे.

सुराज्य अभियान सार्थकी

या अंतर्गत बसस्थानकांची दुरवस्था आणि अस्वच्छता यांची छायाचित्रांसह माहिती एस्.टी. महामंडळाचे विभागीय नियंत्रक, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, तसेच परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री यांना देण्यात आली होती. या संदर्भात प्रशासनासह बैठकाही घेण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर गेले महिनाभर आम्ही राबवलेले ‘सुराज्य अभियान’ सार्थकी लागले, अशा भावना ‘सुराज्य अभियान’ समन्वयक अभिषेक मुरूकटे यांनी व्यक्त केली.

बसस्थानके स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न

हा उपक्रम केवळ पुरस्कार मिळेल, म्हणून स्वच्छता अभियान येथपर्यंत मर्यादित न रहाता आपल्या सर्वांचे हे सामाजिक कर्तव्य आहे, या भूमिकेतून नेहमीच एस्.टी. बसस्थानके स्वच्छ रहातील, यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगत मुरुकटे म्हणाले, एस्.टी. महामंडळाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘बसस्थानक स्वच्छता मोहीम’ घोषित केली होती. मात्र 4 महिने उलटून गेल्यानंतरही सर्वच जिल्ह्यातील मुख्य बसस्थानकांसह सर्वच बसस्थानकांची स्थिती कमी-अधिक प्रमाणात विदारक असल्याचे दिसून आले.

यात प्रामुख्याने बसस्थानकांच्या परिसरात कचर्‍याचे साम्राज्य, प्रसाधनगृहाची दुरावस्था, भित्तीपत्रकांमुळे विद्रूप झालेल्या भिंती, तुटलेली आणि अस्वच्छ बाकडी, बंद असलेले पिण्याच्या पाण्याचे नळ, जळमटांनी माखलेले छत, परिसरातील खड्डे, बंद उपहारगृहे, प्रसाधनगृहाचे तसेच सांडपाणी रस्त्यावर सोडणे आदी गोष्टी आढळून आल्या.

सरकारला सहाय्य करू

बसस्थानकांच्या या दयनीय स्थितीविषयी ‘सुराज्य अभियाना’अंतर्गत प्रत्येक बसस्थानकाच्या विभागीय नियंत्रकांना माहिती देण्यात आली.यामध्ये अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘स्वच्छ बसस्थानक’ ही संकल्पना प्रत्यक्षात यावी, तसेच बसस्थानकांवर किमान प्राथमिक सुविधा तरी उपलब्ध व्हाव्यात, अशी आमची मागणी आहे. ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान’ ही चांगली सुरुवात आहे. या अभियानाला यशस्वी करण्यासाठी एक जागरूक संघटना म्हणून आम्ही निश्चितच राज्य सरकारला साहाय्य करू.