आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोशल मीडिया हे कलागुण दाखवण्यासाठी तरुणांसाठी चांगले व्यासपीठ आहे. सोशल मीडियात मोठी ताकद असून एखाद्या गोष्टीने देश हादरला जातो. बेरोजगारी, महिला सुरक्षितता, भ्रष्टाचार याबाबत बोलण्यास सामान्य माणूस घाबरतो. परंतु त्याचे मुद्दे मांडण्यासाठी वेगळ्या प्रकारचे मार्ग अवलंबणे आवश्यक आहे. आपल्या समस्या लोकांपर्यंत पोहाेचवण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करणे गरजेचे आहे, असे मत अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने शुक्रवारी व्यक्त केले.
तरुणांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित ‘इंडियाज रायझिंग टॅलेंट’ या राष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात ती बोलत होती. यावेळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही., राष्ट्रीय सचिव कृष्णा अल्वारू, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत, उपाध्यक्ष शिवराज मोरे, हास्य कलाकार मकरंद टिल्लू, मिमिक्री कलाकार योगेश सुपेकर उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी मितेंद्र सिंग यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय सचिव डॉ. वैष्णवी किराड यांनी सूत्रसंचालन केले
तेजस्विनी म्हणाली, महिला सुरक्षेबाबत बोलताना मी सांगते, अनेक मुलांना मी छेडछाड केल्याने मारले आहे. मात्र, माझ्यासारख्या बेधडक मुली कमीच आहेत. महिलांबाबत घडणाऱ्या अनेक गोष्टी मुली कोणाशी बोलू शकत नाहीत. त्याकरिता सोशल मीडियाचा वापर महत्त्वपूर्ण आहे. आज गल्लीबोळात बुद्धिमत्ता आहे मात्र ते योग्य मार्गाने समोर येणे आवश्यक आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे चांगल्या प्रकारचे व्यासपीठ आहे.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड म्हणाली, खूप कमी वेळात अधिक कलागुण दाखवण्याची संधी मला मिळाली आहे. प्रत्येकात काही ना काही कलागुण असतात. केवळ ते प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ असणे आवश्यक असते. शाळेत असताना सांगितले जाते, तुम्ही सर्व गोष्टीत सहभागी व्हा. मात्र खऱ्या आयुष्यात त्याचा वापर झाला पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.