आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना अटक करावी आणि राज्य सरकारने मोहम्मद पैगंबर बिल पास करावे, या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अमन मार्चचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या दोन्ही मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्यामुळे आज मदनपुरा ते आझाद मैदान निघणारा अमन मार्च तूर्तास स्थगित केल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
समाजविरोधी घटकांचा धोका
काही समाजविरोधी घटक या मोर्चाला वेगळे वळण देऊन वातावरण बिघडवू शकतात. त्यामुळे हा मार्च काढू नये, अशी विनंती पोलिस आयुक्त संजय पांडे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांनाै केली होती. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना अटक करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आम्ही पूर्ण करीत आहोत आणि लवकरच त्यांना अटक करू, असे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी सांगितले. तर, मोहम्मद पैगंबर बिल पास करण्यासाठी सर्व सहमती बनवण्यासाठी पुढाकार घेऊ, त्यासाठी सर्व संबंधित घटकांची बैठक बोलावून चर्चा करू आणि हा कायदा पास करू, असे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. त्यामुळे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळाने आज होणारा अमन मार्च तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
लवकरच पुढील दिशा ठरवणार
अमन मार्चच्या आयोजनात सहभागी सर्व संघटनांची बैठक आयोजित करून पुढील दिशा ठरवली जाईल, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. यावेळी शिष्टमंडळात वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन खान, कारीब कमर रजा, अब्दुल कादिर आसी, मौलाना अब्दुल रज्जाक, मौलाना अलिमी परवेज आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.