आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोळक्यांविरुद्ध गुन्हा:उत्तरप्रदेशातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून पुण्यात तिघांवर खुनी हल्ला!

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तरप्रदेशातील निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या वादातून टोळक्याने तिघांवर चाकुने वार केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. या प्रकरणी पाच जणांच्या विरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे.

कलामुद्दीन जमील अहमद (वय २१, सध्या रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा,पुणे), अमीर आणि अबरार अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी शकील खान, कलीम खान यांच्यासह पाच जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कलामुद्दीन अहमदने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कलामुद्दीन आणि आरोपी मूळचे उत्तरप्रदेशातील आहेत.

दोन वर्षांपूर्वी उत्तरप्रदेशातील एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांच्यात वाद झाला होता. कलामुद्दीन, अमीर, अबरार कोंढव्यातील भैरवनाथ मंदिर परिसरातून रात्री निघाले होते. त्या वेळी आरोपींनी तिघांवर चाकुने वार केले. तिघे जण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करत आहेत.

युवकाला बेदम मारहाण प्रकरणी हाॅटेलमधील बाऊन्सरसह चौघांच्या विरुद्ध गुन्हा

कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेलमध्ये किरकोळ वादातून महाविद्यालयीन युवकाला बेदम मारहाण करण्यात आल्यची घटना घडली. या प्रकरणी चौघांच्या विरुद्ध मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.आर्यन रोहित दत्ता (वय १९, रा. वर्षा पार्क सोसायटी, बाणेर ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. आर्यनला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत आर्यनने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी रितेश विनायक निम्हण, शंतनू मराठे, किशोर मुने आणि सौरभ जाधव ( सर्व रा. पाषाण ) यांच्याविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्यन महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. तो मित्रांसोबत दुपारी कोरेगाव पार्कमधील एका हॉटेलमध्ये गेला होता. तेथे त्याच्या मित्राची बाऊन्सरसोबत वादावादी झाली. त्यामुळे ते तेथून दुसऱ्या हॉटेलमध्ये गेले. आरोपींनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आर्यन रिक्षाने घरी निघाला.

आरोपींनी कल्याणीनगर पुलाजवळ रिक्षा अडवून त्याला बेदम मारहाण केली.या प्रकारानंतर मित्रानी आर्यनला खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना त्याने पोलिसांकडे फिर्याद नोंदवली. सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे तपास करत आहेत.