आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हाथरस घटनेचा सर्व स्तरातून निषेध नोंदवला गेला ही चांगली गोष्ट आहे. तरुण पिढी आता महिलांवरील अत्याचारांकडे एका वेगळ्या नजरेतून पाहताना दिसत आहे. संघ-भाजप हे महिला उपभोग्य वस्तू आहे असा प्रचार आणि प्रसार करतात. ती महिला आहे, तिला जगण्याचा अधिकार आहे आणि तिचे अधिकार शाबूत राहिले पाहिजेत. तिला जसे जगायचे तसे जगता आले पाहिजे. तिच्यावर कुणी अत्याचार करू नये, अशा पद्धतीची मानसिकता नव्या पिढीकडे आहे. ही नवी पिढी देशभरात रस्त्यावर उतरलेली दिसणे हे चांगले लक्षण आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पुण्यात केली.
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ वंचितच्या वतीने आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ‘हाथरसमधील भगिनीवरील अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध’,‘दलितांवर अत्याचार करणाऱया योगी सरकारचा धिक्कार असो,’ असे फलक कार्यकर्त्यांच्या हातात झळकत होते.महिला म्हणजे उपभोग्य वस्तू, असाच संघ आणि भाजपाचा दृष्टीकोन आहे. पुरावे नष्ट करण्यासाठीच हाथरसमधील तरुणीच्या पार्थिवाला पोलिसांकडून अपरात्री अग्नी देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. लवकरच आपण हाथरसला जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
पोलिसांना पुरावे नष्ट करायचे होते
आंबेडकर म्हणाले, या प्रकरणात डॉक्टरांनीही स्टेटमेंट बदलले आहे. ट्रीटमेंटचे पेपर प्रथम जप्त केले पाहिजेत. अत्याचार झाले नाहीत, मणक्याचे हाड मोडल्याने तरुणीचा मृत्यू झाला, असे म्हटले गेले. मात्र, आपल्यावर अत्याचार झाला असून चार जणांची नावे पीडितेने घेतली आहेत. त्यामुळे हा जबाब ग्राह्य धरून संबंधितांवर कारवाई व्हायला हवी, अशी आपली मागणी आहे. मुळात पोलिसांना या प्रकरणातील पुरावे नष्ट करायचे होते. बलात्कार झाला नाही अशी आवई उठवली जात असून यूपी सरकारच्या चालीनेच पोलिस बोलत आहेत. पुरावे नष्ट करण्यासाठीच अपरात्री तरुणीचा मृतदेह जाळण्यात आला.
काँग्रेसकडून निषेध : हाथरस येथील मुलीवरील सामूहीक बलात्कार व हत्या प्रकरणी भाजपा सरकार पहिल्या पासूनच काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. पीडित कुटुंबाला कोणालाही भेटू दिले गेले नाही. विरोधी पक्षाचे नेते योगी सरकार कोणालाही तरी वाचवण्याचा आटापीटा करत आहे, अशी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.