आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनमानस अस्वस्थ:शुक्रवारी शहर बंद, सर्व पक्ष एकवटले शिक्षण संस्था, उद्याेग-व्यापार ठप्प करू

साेलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्यांची मालिकाच सुरू झाल्याने जनमानस अस्वस्थ झाला आहे. त्याचा सामूहिक निषेध करण्यासाठी शुक्रवारी (ता. १६) ‘साेलापूर शहर बंद’ची हाक देण्यात आली. शिवजन्माेत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या हाकेला प्रतिसाद देत सर्वपक्षीय नेतेमंडळी एकवटली. त्यांच्या दिमतीला सामाजिक संघटना आणि सेवाभावी संस्थाही उतरल्या. साेमवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी बंदसंदर्भात माहिती दिली. व्यापारपेठांसह आैद्याेगिक उत्पादन बंद असणार असा दावा केला. शिक्षण संस्थाचालकांनाही सहभागी हाेण्याचे आवाहन केले. त्यामुळे शहर कडकडीत बंद राहील, असे म्हणाले.

मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष पद्माकर काळे, उत्सव समिती अध्यक्ष शेखर फंड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषाेत्तम बरडे, प्रताप चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नराेटे, राजन जाधव, माऊली पवार, सुहास शिंदे, विनाेद भाेसले, प्रहार संघटनेचे जमीर शेख आदी या वेळी उपस्थित हाेते.

बार्शी, नातेपुते करमाळ्यात व्यापारपेठा कडकडीत बंद महापुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्याचे पडसाद ग्रामीण भागात माेठ्या प्रमाणात उमटले. त्याचा निषेध करण्यासाठी साेमवारी बार्शी, नातेपुते आणि करमाळा बंदचे आवाहन करण्यात आले हाेते. त्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. व्यापारपेठा, आठवडी बाजारही बंद हाेते. बार्शीत तहसीलदार सुनील शेरखाने यांनी निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी नेते, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, तानाजी ठोंबरे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुवर्णा शिवपुरे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विक्रम सावळे आदी उपस्थित हाेते.

माकप सहभागी, मुंबईतील माेर्चातही हाेणार सहभागी रयतेचा राजा शिवछत्रपती महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यासाठी थाेर समाजसुधारकांनी आयुष्याची राखरांगाेळी केली. त्यांच्या या कार्याची अवहेलना करणारे राज्यपाल काेश्यारी, सुधांशु त्रिवेदी, चंद्रकांत पाटील यांना त्वरित पदावरून हटवण्याची मागणी माकपने केली. दत्तनगर येथील पक्षाच्या कार्यालयात साेमवारी स्वतंत्र बैठक झाली. ज्येष्ठ नेते नरसय्या आडम यांनी तीव्र भावना मांडल्या. शुक्रवारच्या ‘बंद’ मध्ये यंत्रमाग, विडी उद्याेगाला सहभागी करून घेणार असल्याचे म्हणाले. पक्षाचे पाॅलिट ब्यूराे सदस्य डाॅ. अशाेक ढवळे यांनी शनिवारी धर्मनिरपेक्ष पक्षांनी मुंबईत राणीची बाग ते आझाद मैदान या मार्गावर मोर्चा आयाेजित केल्याचे सांगितले.

या चार मागण्या ठेवल्या १ छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांची पदावरून हकालपट्टी करावी. २ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जाेतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याला भिकेची उपमा देणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा नाेंद करावा. ३ सर्वच महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्ये करणाऱ्यांच्या विराेधात अजामीनपात्र गुन्हा नाेंद करण्याची कायदेशीर तरतूदच शासनाने करावी. त्याचे विधेयक संमत करावे. ४ ऐतिहासिक विषयांवर चित्रपट निर्मिती झाल्यानंतर त्याला सेन्साॅर बाेर्डचे प्रमाणपत्र देताना इतिहास तज्ञांचा सल्ला घ्यावा. त्यांच्या संमतीनेच चित्रपट प्रदर्शित करावेत.

बातम्या आणखी आहेत...