आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मराठा समाजाच्या जाहीर कार्यक्रमात मराठा समाजातील प्रमुखांनी राजे तुम्ही आदेश द्या, म्यानातून आम्ही अर्धी तलवार बाहेर काढली आहे, अशी मागणी केली होती, यावर मी माझ्या भाषणात तुम्ही तलवार काढण्याची गरज नाही, गरज पडली तरी मी तलवार बाहेर काढीन, असे वक्तव्य केले होते. हे विधान मी समाजात शांतता राखण्यासाठी केले, समाजाला शांत करण्यासाठी केले होते, पण माध्यमांतून या विधानाचा चुकीचा अर्थ काढल्याचे स्पष्टीकरण छत्रपती संभाजी महाराज यांनी सोलापुरातील पत्रकार परिषदेत दिले.
शुक्रवारी सायंकाळी सोलापुरात आल्यानंतर हॉटेल बालाजी सरोवर येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून माध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या वक्तव्यावर छत्रपती संभाजी महाराज यांनी स्पष्टीकरण दिले. मराठा आरक्षणावरून समाजातील तरुण खूपच आक्रमक आहेत. त्यांना शांत करण्याची जबाबदारी मी स्वत:वर घेतली आहे. आरक्षणावरून दलित व ओबीसी समाजामध्ये कोणताही संघर्ष होणार नाही, याची काळजी घेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टीकेला उत्तर देताना संभाजीराजे म्हणाले, संसदेतही मी या मुद्यावर तीन वेळा भाषणे केली आहेत. त्यानंतर इतर खासदारांनी मागणी केली आहे. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलनही केले आहे. १९६७ पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत होते, मग आता का दिले जात नाही, असा प्रश्नही संसदेत उपस्थित केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावरही संभाजी महाराजांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आहेत. राजर्षी शाहू महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी केलेले वक्तव्य निंदनीय आहे. तसेच विजय वडेट्टीवारांच्या भूमिकेने मी फार व्यथित झालो आहे. वडेट्टीवार मला एक बोलले आणि आता दुसरे बोलतायत, माझी त्यांना हात जोडून विनंती आहे, त्यांनी असे करू नये, असेही ते म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.