आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकलेक्टर कचेरीला गुरुवारी गोठ्याचे रूप आले होते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावरील ‘औद्योगिक वसाहतीसाठी संपादन’चा शेरा कमी न केल्याचा निषेध करत कार्यालयाच्या आवारात जागोजागी गुरे बांधली होती. मंद्रूप येथील शेतकऱ्यांसह जनावरे घेऊन प्रहार संघटनेने आंदोलन केले. प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मागील दोन वर्षापासून वारंवार निवेदन देऊन, तक्रार करूनही उतारावरील शेरा कमी न केल्याने आंदोलन करत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सायंकाळी महाराष्ट्र औद्याेगिक महामंडळाकडून शेरा कमी करण्याचे पत्र आंदोलकांना देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
प्रस्तावित एमआयडीसीसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे राज्य सरकारने भूसंपादनासाठी प्रक्रिया सुरू केली होती. पण यासाठी १८२ शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास विरोध केल्याने भूसंपादन प्रक्रिया खोळंबलीय. दरम्यान, या प्रकारानंतर या परिसरात या घटनेची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे. भूंसपादनाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला असून अशी आंदोलने करण्याची वेळ देऊ नये, असेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
आंदोलनास परवानगी नाही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात काही जनावरे बांधली. काही जनावरे थेट बहुउद्देशीय सभागृहात नेली. तिथे प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनास पोलिसांकडून परवानगी घेतली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले.
महिन्यात शेरा कमी करू आंदाेलकांच्या भावना लक्षात घेऊन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी औद्योगिक महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संवाद साधला. सायंकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयास शेरा कमी करण्याबाबतचे पत्र मिळाले. पुढील ३० दिवसांत सात-बारा उताऱ्यावरील भूसंपादनाचा शेरा कमी करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.