आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूरच्या एनटीपीसीमध्ये दगडी कोळशाबरोबर सात ते दहा टक्के बायोमास जाळण्यास परवानगी मिळाली आहे. यानुसार एनटीपीसीला वर्षाला सहा लाख साठ हजार मेट्रिक टन बायोमास लागेल, अशी सोलापूर एनटीपीसीचे मुख्य महाप्रबंधक श्रीनिवास राव यांनी बांबूमॅन पाशा पटेल यांच्याशी चर्चा करताना दिली. थर्मल पॉवर सेंटरमध्ये बायोमास ज्वलनाच्या विषयावर पाशा पटेल यांनी सोलापूर एनटीपीसीला भेट देऊन चर्चा केली, यावेळी ते बोलत होते. दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या सूचना आणि नियोजनाने सोलापूर एनटीपीसी कार्यालयात हा संवाद सोहळा झाला. एनटीपीसीचे डीजीएम गुरुदास मिश्रा, एचआर जीएम श्रीनिवास मूर्ती , सेंद्रिय शेतीचे शेतकरी अंकुश पडवळे, मारापूर (मंगळवेढा ) चे शेतकरी हरी यादव, सोलापूरचे संतोष माळी आदींची उपस्थिती होती.
पॅरिस कराराप्रमाणे कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी आता देशाअंतर्गत असलेल्या सर्व थर्मल पॉवर सेंटरमधून दगडी कोळशाचे ज्वलन टप्प्या-टप्प्याने बंद करण्यात येत आहे. कार्बन ऊत्सर्जन तापमान वाढीला मदत करीत आहे. एकट्या सोलापूर थर्मलमधून जर रोज दोन हजार मेट्रिक टन दगडी कोळसा जाळला जातो. एक किलो दगडी कोळसा जाळला तर दोन किलो ८०० ग्राम कार्बन उत्सर्जन होते. या नियमाप्रमाणे सोलपूर एनटीपीसी रोज ५६ हजार किलो आणि वर्षाला दोन कोटी एक लाख ६० हजार किलो कार्बन उत्सर्जन करते. एवढे कार्बन उत्सर्जन होत राहिले तर या पृथ्वीवर मानवजातच राहणार नाही हे उघड आहे. त्यामुळे बायोमास वापरण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. परळी थर्मल पॉवर सेंटरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर दहा टक्के बायोमास ज्वलन करण्यासंबंधी टेंडर काढले आहे. या बायोमासमध्ये चार हजार उष्मांक (कॅलरीक व्हॅल्यू) असलेले बायोमास लागते. त्यानुसार दगडी कोळशाइतकाच उष्मांक बांबूमध्ये असल्याचे श्री. पटेल म्हणाले.
बांबू पीक सोलापूरच्या शेतीचे अर्थचक्र बदलू शकते : पाशा पटेल पाशा पटेल म्हणाले की, अत्यंत सोप्या पद्धतीने बांबूपासून पिलेट्स बनवून ज्वलनास तयार केले जाते. शेतकरी उत्पादक कंपनी बनवून हा पुरवठा केल्यास याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. एकट्या सोलापूर एनटीपीसीला सहा लाख ४० हजार बायोमासचा पुरवठा करायचा असेल तर सोलापूर जिल्ह्यातील १७ हजार एकरावर बांबू लागवड करावी लागणार आहे. बांबू हे पीक लावल्यास चौथ्या वर्षांपासून कापायला येते आणि पुढची चाळीस ते शंभर वर्षे आपल्या शेतात राहते. शून्य आंतरमशागत, झीरो बजेट कामगार खर्च आणि उसाच्या दहा टक्के पाण्यात येणारे आणि चार ते पाच हजार रुपये टन भावाने विकले जाणारे बांबू पीक सोलापूरच्या शेतीचे अर्थचक्र बदलू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.