आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंढरपूरमधून एक धक्कादायक बातमी आली आहे. येथे माघी एकादशीसाठी आलेल्या भाविकांना विषबाधा झाली आहे. उपवासाची भगर आणि आमटी खाल्याने हा प्रकार घडला. यातल्या 137 जणांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक महेशकुमार माने यांनी माध्यमांना दिली आहे.
पंढरपूरच्या चार महत्त्वांच्या वाऱ्यापैकी एक म्हणजे माघी वारी. या एकादशीसाठी राज्यभरातून भाविक विठ्ठलाचरणी येतात. या वर्षीही लाखो भाविकांनी पंढरपूर गाठले आहे. दिंड्या, पालख्या, टाळ आणि मृदंगाच्या गजरात बुधवारी माघी एकदशीचा सोहळा मोठा उत्साहात पार पडला. पंढरपुरातले मठ, मंदिर, धर्मशाळा भजन, कीर्तन, प्रवचनाने दुमदुमून गेल्या. विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा तीर, प्रदिक्षणा मार्ग, स्टेशन रस्ता गर्दीने फुलून गेला.
नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातून अनेक भाविक माघी यात्रेसाठी आले आहेत. त्यांची मनाठा-पंढरपूर दिंडी गेल्या पंचवीस वर्षांपासून पंढरीत येते. यंदा ही दिंडी 31 जानेवारी रोजी दाखल झाली. हे भाविक संत निळोबा सेवा मंडळ मठात मुक्कामी होते. बुधवारी एकदशी असल्याने त्यांनी भगर आणि आमटी खाल्ली.
मनाठा-पंढरपूर दिंडीतल्या भाविकांना गुरुवारी पहाटे मळमळ, उलट्या, चक्कर सुरू झाली. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. अन्न औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.