आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक उत्कर्ष महोत्सवास सोमवारी सुरुवात झाली. विद्यापीठ परिसरात निघालेल्या शोभायात्रेत सामाजिक संदेश फलक व विद्यार्थ्यांच्या पारंपरिक वेशभूषेने लक्ष वेधले. काश्मीर ते कन्याकुमारी भारत एक हमारा.. हम सब एक है.. देश हमारा प्यारा.. भारत माता की जय.. अशा देशभक्तीच्या घोषणांनी विद्यापीठाचा कॅम्पस दणाणला. राज्यातील विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)च्या महोत्सवात १३ विद्यापीठांनी शोभायात्रेत सहभाग नोंदवला.
महोत्सवात एकूण राज्यातील १६ विद्यापीठांनी सहभाग घेतला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा परिसरात पुढील चार दिवस उत्कर्ष महोत्सवाचे सांस्कृतिक कार्यक्रम हो णार आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभागातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सव होत आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास विद्यापीठ कॅम्पसमधून शोभायात्रा निघाली. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी कुलसचिव योगिनी घारे, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांत कुमार वनंजे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्य ब्रँड अॅम्बेसेडर (सदिच्छा दूत) प्रिया पाटील, वित्त व लेखाधिकारी श्रेणिक शहा, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. गुणवंत सरवदे आणि समन्वयक डॉ. केदारनाथ कळवणे यांची उपस्थिती होती.
मुंबई विद्यापीठाच्या शिस्तबद्ध संघाने दिला मुली वाचवा, देश वाचवाचा संदेश
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या संघाने माता अंबाबाईचा जागर केला. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध रीतीने शोभायात्रेत सहभागी होऊन मुली वाचवा, देश वाचवा तसेच स्त्री अत्याचार थांबवण्याचे संदेश दिले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, एचएसएनसी विद्यापीठ, आणि एसएनडीटी विद्यापीठ मुंबईच्या संघानेही यात सहभाग नोंदविला.
‘गोंडवाना’ कडून आदिवासींचा सन्मान
शोभायात्रेत यजमान विद्यापीठाचा संघही मोठ्या दिमाखात सहभागी झाला. त्याने एकसंघ भारताच्या संकल्पचा संदेश दिला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या संघाने भारतीय संस्कृतीवर शोभायात्रेत सादरीकरण केले. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या संघाने आदिवासी बांधवांचा शोभायात्रेत सन्मान केल्याचे दिसून आले. कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या संघाने भारतीय संस्कृतीचा जागर केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाने अवयव दान श्रेष्ठ दान असल्याचे विविध सजीव प्रसंगाद्वारे अधोरेखीत केले.
संतांनी लोककलेतून प्रबोधन केले : रस्तोगी लोककलेच्या माध्यमातून संतांनी सामाजिक प्रश्न तसेच समस्यांवर प्रभावीपणे समाज प्रबोधन केले होते. त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी शासनाच्या स्वच्छता तसेच विविध योजनांचा प्रचार- प्रसिद्धीसाठी लोककलेचा वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन आवाहन उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी केले. ते महोत्सवाचे उद्घाटक म्हणून बोलत होते. शोभायात्रेनंतर उद्घाटन सत्र झाले. यावेळी मान्यवर मंडळी उपस्थित होत्या. ममता बोल्ली, श्रुती देवळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. गुणवंत सरवदे यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.