आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीका:गोड बोलून पवार कधी गळा दाबतील हे सांगता येत नाही, 40 आमदारांना पाडण्याचा प्लॅन केला; शहाजीबापू पाटलांचा आरोप

सांगोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कधी गोड बोलून गळा दाबतील यांना कळणार पण नाही, अशी टीका शिंदे गटाचे नेते तथा सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे. तर आम्हाला 40 जणांना पाडण्याचा प्रयत्न बाळासाहेब थोरात आणि अजित पवारांकडून सुरू असल्याने आम्ही वेगळा निर्णय घेतला, असेही त्यांनी म्हटले आहे.

आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोल्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा दावा केला असून शरद पवारांवर टीकास्त्र डागले आहे.

शहाजीबापू पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील तसेच काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांचा हळूवार प्लॅन सुरु होता. की, आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना 10 ते 15 जागांपेक्षा जास्त जागा निवडून येऊ द्यायच्या नाहीत. आणि त्याचवेळी दुर्दैवाने उद्धव ठाकरे हे कोरोना आणि आजारपणामुळे मंत्रालयात येत नव्हते.

आम्हा 40 जणांना पाडणार होते

शहाजीबापू पाटील पुढे बोलताना म्हणाले की, माझ्यासह बाहेर पडलेल्या 40 ही आमदारांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून होणारा धोका आमच्या लक्षात आला होता. तेव्हा आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने शिवसेनेला पुढे नेणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आमच्या शिवसेनेचे नेतृत्व दिले. यामुळे शिवसेनेची वाढ होणार असून सर्व निवडणुकीत विजयी होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

पवार कधीही गळा दाबतील

शहाजीबापू पाटील पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. ते गेली 45 वर्षे माझे पालक होते. मात्र, त्यांचा इतिहास पाहिला तर त्यांनी सोबत आलेल्या लोकांना आणि पक्षांना हळू हळू संपवले आहे. शिवसेनेला ते कधीही मोठे होऊ देणार नाही. शिवसेनेच्या नेत्यांनी सर्वांत जास्त शिवसेनेवर टीका केली आहे. यामुळे शरद पवार कधी गोड बोलून गळा दाबतील हे सांगता येणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.